सातारा - साताऱ्याची वाढीव मागणी लक्षात घेऊन कास तलाव उंची वाढीचे काम पूर्णत्वास जात आहे. तथापि हे जादाचे पाणी आणण्यासाठी वाढीव जलवाहिनीच्या कामाबाबत पालिका प्रशासन ढीम्म असल्याबाबत चिंता व्यक्त करून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तातडीने सर्व्हे आणि अंदाजित प्रस्ताव करून पाठवा, अशा सक्त सूचना मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.
मेपर्यंत वाढीव पाणीसाठा शक्य
साताऱ्याची पुढील ५० वर्षांची लोकसंख्या गृहीत धरून कास धरण उंची वाढवण्याचे काम लवकरच पूर्णत्वास जाणार असले तरी वाढीव पाणी क्षमता गृहीत धरून कास-सातारा अशी त्या क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे. याबाबत सातारा पालिका प्रशासनाकडून काहीच कार्यवाही झालेली नाही. गेल्या काही वर्षांपासून कास धरण उंची वाढवण्याचे काम सुरू आहे. सातारकरांचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने सुरुवातीला ४३ कोटी तर, नुकताच ५८ कोटी वाढीव निधी दिला. या प्रकल्पाचे काम मेपर्यंत पूर्णत्वास जाईल.
वाढीव पाणी आणणार कसे?
कास धरणाच्या उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले तरी सातारकरांना मात्र पाणी टंचाईला सामोरे जाण्याची भीती आहे. धरणाची उंची वाढल्यानंतर पाणी पातळीत पाच पट वाढ होणार आहे. कास धरणापासून सातारा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी १९९८ ते २००० या कालावधीत जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. उंची वाढल्यानंतर या जलवाहिनीतून पाणीपुरवठा वाढीव क्षमतेने होणार नाही. वाढीव पाणीपुरवठा करण्यासाठी वाढीव क्षमतेची नवीन जलवाहिनी टाकणे आवश्यक आहे.
तातडीने सर्वेक्षण करा
स्वखर्चाने नवीन जलवाहिनी टाकणे पालिकेचे बजेट पाहता पालिका प्रशासनाला शक्य होणार नाही. वाढीव क्षमतेची जलवाहिनी नसल्याने धरणाचे काम पूर्ण होऊनही सातारकरांना पाणी मिळणार नाही. वाढीव क्षमतेची जलवाहिनी टाकणे आवश्यक असून त्यासाठी सर्वेक्षण करून इस्टिमेट तयार करून वाढीव जलवाहिनी टाकण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर करावा,अशा सक्त सूचना आ. भोसले यांनी मुख्याधिकाऱ्यांना केल्या आहेत.