ETV Bharat / state

5 एप्रिलपर्यंत थकित 'एफआरपी' न दिल्यास कारखानदारांना धडा शिकविणार - राजू शेट्टी

author img

By

Published : Mar 26, 2021, 3:42 PM IST

सहकारी साखर कारखान्यांची 5 एप्रिलपर्यंत आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) न केल्यास गनिमी काव्याने आंदोलन करत कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला.

कराड

कराड (सातारा) - सहकारी साखर कारखान्यांची 5 एप्रिलपर्यंत आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) न केल्यास गनिमी काव्याने आंदोलन करत कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. दरम्यान, एफआरपी थकविणार्‍या कारखान्यांची आरआरसी (रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेट) करायला तयार असल्याचे आश्वासन सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

थकित एफआरपी संदर्भात राजू शेट्टी यांनी सह्याद्री साखर कारखान्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. कारखान्याच्या वार्षिक सभेवेळीच शेट्टींनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे कारखान्याचे चेअरमन तथा राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी शेट्टींसमवेत शासकीय विश्रामगृहावर बैठक घेऊन चर्चा करण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार त्यांची बैठक झाली. बैठकीत शेट्टींनी एफआरपी थकविणार्‍या कारखान्यांची आरआरसी तयार करण्याची मागणी केली. तसेच एफआरपी थकबाकीच्या मुद्यावर कारखान्याचे चेअरमन अथवा संचालक यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरले पाहिजेत, अशी भूमिका त्यांनी मांडली.

सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी 1 एप्रिलला साखर आयुक्तालयात जाऊन साखर कारखान्यांच्या थकीत एफआरपीची आपण माहिती घेणार आहोत. मार्च अखेरपर्यंत साखर कारखान्यांकडे 2300 कोटी इतकी एफआरपी थकीत होती, अशी माहिती दिली, तर 5 एप्रिलपर्यंत एफआरपी दिली नाही, तर यापूर्वी झाला नाही असा धमाका करून साखर कारखानदारांना वठणीवर आणू, असा इशारा राजू शेट्टींनी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.