ETV Bharat / state

आर्थिक संकटात 'नमराह कोविड हॉस्पिटल' गरिबांसाठी बनलंय संजीवनी

author img

By

Published : May 27, 2021, 3:14 PM IST

Updated : May 27, 2021, 5:14 PM IST

कोरोना रुग्णालयाच्या भरमसाठ बिलांमुळे गोरगरीब रुग्ण आज आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात सांगलीचे नमराह कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आर्थिक"संजीवनी" देणारे ठरले आहे.

Namarah covid Hospital
नमराह कोविड हॉस्पिटल

सांगली - कोरोना रुग्णालयाच्या भरमसाठ बिलांमुळे गोरगरीब रुग्ण आज आर्थिक संकटात सापडले आहेत. अशात सांगलीचे नमराह कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आर्थिक"संजीवनी" देणारे ठरले आहे. अवघे अडीच हजार रुपये प्रतिदिन ऑक्सिजन बेडसाठी आकारले जातात. त्यामुळे कोरोना परिस्थितीत वैद्यकीय क्षेत्रासाठी "नमराह" हे रोल मॉडेल ठरले आहे.

नमराह कोविड हॉस्पिटलमध्ये कमी दरात होतात उपचार

'नमराह' उपचाराबरोबर आर्थिक आधाराचे सेंटर

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नमराह फाउंडेशन, सांगली महापालिका यांच्या माध्यमातून दहा ऑक्सिजन बेडचे रुग्णालय सुरू आहे. या ठिकाणी गोर-गरीब रुग्ण उपचार घेत आहेत. वास्तविक राज्य शासनाने ऑक्सिजन बेडसाठी 8 हजारच्या आसपास शासकीय दर निश्चित केले आहेत. मात्र, नमराह कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ प्रति दिवस 3 हजार 500 इतके बिल आकारले जाते, जे शासकीय दराच्या अर्ध्यापेक्षा कमी दर आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीनंतर मध्यमवर्गीय कुटुंब अडचणीत आली आहेत. अशा स्थितीमध्ये जर कोरोनाची उपचाराची स्थिती निर्माण झाल्यास शासकीय दरसुद्धा गोरगरिबांना न पेलणारे आहेत. या जाणिवीतून नमराह फाउंडेशन व महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने 'ना नफा, ना तोटा' या तत्त्वावर नमराह कोविड सेंटर सुरू केले.

"प्राणवायु दाता"मुळे आर्थिक भार आणखी कमी

नमराह फाऊंडेशनचे कार्यवाहक रहिमभाई मुल्ला म्हणाले, गेल्या वर्षी नमराह फाउंडेशनकडून केअर सेंटर सुरू करण्यात आलं होतं, आणि आता थेट कोरोना रुग्णांवर उपचार करणारा सेंटर सुरू केला आहे. अल्प दरात तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली याठिकाणी उत्तम उपचार सुरू आहेत. सध्या 10 ऑक्सिजनचे बेड आहेत. प्रत्येकी साडे तीन हजार रुपये प्रती दिवस इतका आपला अत्यंत कमी दर आहे. पण यामध्येही रुग्णांना अधिक सूट मिळून अधिकचा आर्थिक हातभार मिळावा, या उद्देशाने नमराह फाऊंडेशनच्या माध्यमातून व नगरसेवक संतोष पाटील यांच्या पुढाकारातून "प्राणवायू दाता"हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. नमराह कोविड सेंटरमध्ये 10 बेडसाठी दररोज प्राणवायूसाठी दहा हजार रुपये इतका खर्च येतो आणि तो एखाद्या दानशुर, सामाजिक संस्था किंवा अन्य संघटनांकडून मिळाल्यास प्रत्येक रुग्णाच्या आर्थिक खर्चात मदत होऊ शकते आणि या हाकेला साद देत आता अनेक दानशूर व्यक्ती व सामाजिक संस्था नमराहच्या "प्राणवायू दाता"या उपक्रम व कार्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. मिळणारी देणगी ही उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या खात्यात सामायिक पद्धतीने वर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णाला एक हजार रुपयांची आणखी सूट मिळत आहेत, असं रहीमभाई मुल्ला यांनी सांगितले.

हेही वाचा - शरद पवार यांचा सरकारला पूर्ण आशीर्वाद - संजय राऊत

25 ते 30 हजार इतके बिल

प्रभागातील नगरसेवक असणारे नगरसेवक संतोष पाटील हे पहिल्यापासून नमराह फाउंडेशनसोबत आहेत. नमराह फाऊंडेशनला महापालिकेशी संलग्न करून कोविड सेंटरसाठी पालिकेची शाळा उपलब्ध करून देण्याबरोबर नमराहाच्या प्रत्येक कामात संतोष पाटील अग्रभागी असतात. या सेंटरबाबत बोलताना संतोष पाटील म्हणाले, नमराह फाऊंडेशनचे काम सामाजिक बांधिलकी जपणारे आहे. सध्याच्या कोरोनाच्या स्थितीत गोरगरीब रुग्णांच्या उपचारासाठी कोरोना हॉस्पिटल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर त्यांना पालिकेची उर्दू शाळा व इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात आल्या. आज याठिकाणी रुग्णांची उत्तम प्रकारे काळजी घेतली जाते. त्यासाठी खेळीमेळीचे वातावरण निर्माण करण्यात आले आहे. रुग्णांपासून याठिकाणी राहणाऱ्या नातेवाईकांच्यासाठी सकाळच्या नाशत्यापासून 2 वेळचे जेवण, पाणी व इतर गोष्टी मोफत करून देण्यात आल्या आहेत, अनेक जण याठिकाणी अन्नदान करतात. आज खरंतर लॉकडाऊनमुळे प्रत्येकाची आर्थिक स्थिती ढासळली आहे. त्याला कोरोनाची लागण होऊन उपचार घ्यायचे म्हटल्यास शासकीय दराने देखील उपचार घेणे परवडत नाही, पण याठिकाणी 25 ते 30 हजार पर्यंत हॉस्पिटलचे बिले आकारले जाते,जे इतर कोणत्याही खाजगी कोरोना रुग्णालयाच्या तुलनेत केवळ 30 टक्के इतके आहे.

योग्य उपचारामुळे रुग्ण होतायेत बरे

गेल्या 28 दिवसांपासून नमराह फाऊंडेशनच्या कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास 42 रुग्ण या सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. आयसीएमआरच्या गाईडलाईन प्रमाणे योग्य उपचार केले जातात, त्यामुळे 25 ते 30 रुग्ण हे उपचार घेऊन बरे झाले आहेत, अशी माहिती डॉक्टर अब्दुलखालिद देसाई यांनी दिली. तसेच याठिकाणी अनेक रुग्ण ज्यांची ऑक्सिजन लेवल 85 पासून अगदी 60 पर्यंत खाली असताना देखील दाखल करून त्यांच्यावर उपचार केले. ज्यांना ऑक्सिजनच्या पुढील उपचार आवश्यक असतात, त्यांना त्याप्रमाणे इतर ठिकाणी शिफ्ट केले जाते. मात्र, कमी दर आहेत म्हणून याठिकाणी कोणत्याही प्रकारे उपचार पद्धतीमध्ये कमी नाही, असंही डॉक्टर अब्दुलखालिद देसाई सांगतात.

ही तर माणुसकीची वाट

कोरोनाने खरंतर मध्यमवर्गीयांचे गोरगरिबांचे आधीच आर्थिकदृष्ट्या कंबरडे मोडले आहे. अशा या परिस्थितीमध्ये आज अनेक ठिकाणी शासकीय दराच्या नावाखाली रुग्णांची लूट सुरु असल्याच्या तक्रारी समोर येत असताना नमराह फाउंडेशनकडून चालवला जाणारा कोरोना हॉस्पिटल खरतर माणुसकीची वाट दाखवणारे आहे हे नक्की...

हेही वाचा - जायकवाडी धरणाचा पाणीसाठा फक्त 37 टक्के

Last Updated : May 27, 2021, 5:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.