रत्नागिरी - काळोखात काम करू नका, या सामनाच्या अग्रेलखाला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काळ्या अंधारात काम करू नका, ही भूमिका शिवसेनेची नसावी, त्या दैनिकाच्या संपादकाची असावी. काळ्या अंधारात काम कोण करतं, याची कबुली त्यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती. त्यामुळे सामनातून अंधाराची भाषा भाजपला शिकवण्याची गरज नाही, असे लाड म्हणाले.
कोरेगाव-भीमा प्रकरणाच्या तपासाबाबत बोलताना लाड म्हणाले की, एनआयएच्या तपासाची कारणं फारच वेगळी आहेत. शहरी दहशतवादामुळे हा तपास केंद्राने एनआयएकडे दिला आहे. ज्यावेळेला या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलीस करत होते. त्यावेळी शिवसेनाही सत्तेत होती त्यावेळीच त्यांनी हा प्रश्न तेव्हाच्या कॅबिनेटमध्ये किंवा मुख्यमंत्र्यांना का विचारला नाही? असा सवाल लाड यांनी उपस्थित केला.
दरम्यान, याप्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौकशी व्हावी, अशी मागणी होत आहे, याबाबाबत बोलताना लाड म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी पारदर्शी काम केले आहे. स्वतः देवेंद्र फडणवीसच म्हणाले आहेत की, कुठल्याही पद्धतीची चौकशी करा. पण, पारदर्शकपणे करा आमचा आक्षेप नाही. पण, हे करत असताना कुठलाही राजकीय द्वेष ठेवून सुडबुद्धीने राजकारण करू नका. मात्र, हे करताना त्यांनी विचार करून करावे, देवेंद्र फडणवीस यांच्यावर एक बोट दाखवलत तर 4 बोटे त्यांच्याकडे असतील हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा लाड यांनी दिला.
तर सुड भावनेने जर राजकारण करायचे असेल, तर त्यांनी निश्चित करावे. पण, हे देखील त्यांनी विसरू नये की, पुन्हा एकदा भाजपचे सरकार येवू शकते आणि केंद्रात देखील आमचे सरकार आहे. त्यामुळे सुड भावनेचे राजकारण महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा गर्भीत इशारा लाड यांनी दिला.
सामनाला आम्ही किंमत देत नाही -
काळ्या अंधारात काम कोण करते, याची कबुली संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील एका मोठ्या वृत्तपत्राच्या मुलाखतीत दिली होती. त्यामुळे अशा प्रकारच्या अग्रलेखाला आम्ही विचारत नाही. आम्ही त्याला कुठलीही किंमत देत नाही, अशी टीका प्रसाद लाड यांनी केली.