ETV Bharat / state

रायगडमध्ये पावसाचा लपंडाव, प्रशासन सतर्क

author img

By

Published : Jul 18, 2021, 5:43 PM IST

रायगडमध्ये पावसाने लपंडाव सुरू केल्याचे दिसत आहे. मध्येच सूर्यदर्शन होत आहे, तर काही वेळात पुन्हा पावसाचे आगमन होत आहे. नद्याही तुडूंब भरून वाहत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही. दरम्यान, मुंबईत पावसामुळे घरे, भिंती पडून, दरडी कोसळून जवळपास 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

रायगड
रायगड

रायगड - रायगडमध्ये रात्रीपासून पावसाच्या सरी पडत आहेत. पहाटे पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पुन्हा पावसाने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. पाऊस थांबत थांबत पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नद्याही तुडूंब भरून वाहत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत त्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली नाही.

रायगडमध्ये पावसाचा लपंडाव

प्रशासन सतर्क

सतत पडत असलेल्या पावसाने जिल्ह्यातील भात लावणीची कामे अंतिम टप्यात आली आहेत. पावसामुळे जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्ह्यात पावसाचा लपंडाव

जिल्ह्यात 11 जुलैपासून पावसाने सुरुवात केली आहे. आठ दिवसांपासून पावसाने जिल्ह्यात मुक्काम केला आहे. 12, 13 जुलै रोजी मुसळधार पावसाने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पावसाचा लपंडाव सुरू आहे. मध्येच सूर्यदर्शन होत आहे. तर काही वेळातच पावसाचे आगमन होत आहे. आज (18 जुलै) सकाळी थोडी पावसाने विश्रांती घेतली. मात्र अकरा वाजल्यापासून पुन्हा पावसाने सुरुवात केली आहे. दरम्यान, पावसामुळे विजांचाही लपंडाव सुरू आहे.

मुंबईत पावसामुळे दुर्घटना, 21 मृत्यू

शनिवारची (17 जुलै) रात्र मुंबईसाठी काळरात्र ठरली आहे. मुंबईलाही पावसाने झोडपले. पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबईतील विविध भागात घरे, भिंती पडण्याच्या, दरडी कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. एकूण 11 ठिकाणच्या दुर्घटनेत जवळपास 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - मुंबईत पावसाचे नव्हे तर महानगरपालिकेच्या निष्क्रियपणाचे बळी - प्रवीण दरेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.