ETV Bharat / state

राजनाथ सिंहांच्या 'त्या' वक्तव्याचा अमोल कोल्हेंकडून निषेध, म्हणाले खरा इतिहास समोर आला पाहिजे

author img

By

Published : Aug 28, 2021, 5:25 PM IST

Updated : Aug 28, 2021, 5:44 PM IST

शाचे संरक्षण मंत्री शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील सैन्य दलाच्या एका मैदानाला स्वर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव देण्यात आले. त्यानंतर केलेल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात निषेध करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. खरा आणि तर्कसंगत इतिहास लिहिण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

अमोल कोल्हे
अमोल कोल्हे

पुणे - देशाचे संरक्षण मंत्री शुक्रवारी (दि. 27 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते पुण्यातील सैन्य दलाच्या एका मैदानाला स्वर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव देण्यात आले. त्यानंतर केलेल्या भाषणात राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना खेळाचे शिक्षण समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी दिले, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून महाराष्ट्रात निषेध करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून त्याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. खरा आणि तर्कसंगत इतिहास लिहिण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.

राजनाथ सिंह यांच्या विधानाचा निषेध

राजनाथ सिंह यांच्या विधानाचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य ठरले ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असणाऱ्या नैतिक अधिष्ठानामुळे. जर आपण ऐतिहासिक कागदपत्रांचा धांडोळा घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या काळातील स्वराज्यस्थापनेच्या प्रयत्नाविषयी दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आदिलशहाच्या दरबारात शहाजी महाराजांना त्रास तर होणार नाही ना ही स्वामीनिष्ठा त्या पाठीमागे होती हे सिद्ध होते, असे खासदार कोल्हे म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास महाराजांनी भेट 1671 साली झाली

त्याचबरोबर काही ऐतिहासिक कागदपत्रांनुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास महाराज यांची भेट 1671 साली झाली हे दिसून येते. तेव्हा स्वराज्य हे पूर्णत्वास आले होते. असे असतानाही संरक्षणमंत्र्यांनी चुकीच्या आणि ऐकीव माहितीच्या आधारे हे वक्तव्य केले असावे, अशी शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आपला जाज्वल्य इतिहास निःपक्षपातीपणाने, तर्कसंगतीने कुणाचेही स्तोम न वाजवता जगभर सांगण्याची गरज निर्माण झाली आहे, असेही खासदार कोल्हे म्हणाले.

साहित्य, कलाकृतीद्वारे आपला इतिहास जगासमोर मांडला पाहिजे

या प्रकरणात निषेध किंवा एखादा आंदोलन हे क्षणिक ठरू शकते. माझ्या मते ही प्रबोधनाची वैचारिक लढाई आहे आणि ती त्याच माध्यमातून लढली गेली पाहिजे. साहित्य, कलाकृती यांचा समाज मनावर दीर्घकालीन परिणाम होत असतो. त्या माध्यमातून आपण आपला निःपक्षपाती आणि तर्कसंगत इतिहास जगासमोर मांडला पाहिजे, असे स्पष्ट मत खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा - उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चालवली तीन चाकी ई-रिक्षा, सोशल मीडियावर व्हिडिओचा धुमाकूळ

Last Updated : Aug 28, 2021, 5:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.