ETV Bharat / state

जिंतूरच्या शेतकर्‍यांना दोन भामट्यांनी 31 लाखांना गंडवले, सोयाबीन अन् हळद घेऊन दिले नाही पैसे

author img

By

Published : Dec 16, 2020, 6:40 PM IST

जिंतूर तालुक्यातील शेवडीसह परिसरातील 15 हून अधिक शेतकर्‍यांना दोन भामट्यांनी तब्बल 31 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 16 डिसें.)

जिंतूर पोलीस ठाणे
जिंतूर पोलीस ठाणे

परभणी - जिंतूर तालुक्यातील शेवडीसह परिसरातील 15 हून अधिक शेतकर्‍यांना दोन भामट्यांनी तब्बल 31 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. 16 डिसें.) शेवडी येथील शेतकरी बालाजी आश्रोबा घुगे यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अमोल अशोकअप्पा एकशिंगे व बाळू वैजनाथअप्पा एकशिंगे या दोघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवडी (ता.जिंतूर) व परिसरातील काही गावच्या शेतकर्‍यांची त्यांनी 25 जून रोजी हळद व सोयाबीन खरेदी केले होते.

'पैसे नंतर देतो, म्हणून उचलला माल'

संबंधित दोन भामट्यांनी गावातील शेतकर्‍यांचा विश्वास संपादन करत कच्च्या पावत्या करून शेतकऱ्यांचा माल नेला. त्यावेळी मालाचे पैसे थोड्या दिवसांनी देतो, असे म्हटले होते. त्यांच्या त्या बोलण्यावर सर्वांनी विश्वास ठेवला. जवळपास 30 लाख 87 हजार 644 रुपयांचे सोयाबीन व हळद या दोघांनी खरेदी केले. जून महिन्यात हा व्यवहार झाला होता. आडतीसाठी खरेदी असल्याने पैसे नंतर देतो, असे त्यांनी सर्वांना म्हटले. मात्र, अद्यापही शेतकर्‍यांना त्यांच्या मालाचे पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे पैशासाठी शेतकऱ्यांनी संपर्क केला असता, दोघांचेही मोबाईल बंद येत आहे.

'भामट्यांनी आडत दुकानही केले बंद'

या भामट्यांनी त्यांचे आडत दुकान बंद केले. त्यांचा कुठेच संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाली असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आज (बुधवारी) बालाजी आश्रोबा घुगे यांच्यासह परिसरातील 15 हून अधिक शेतकर्‍यांनी जिंतूर पोलीस ठाण्यात या दोघांनी त्यांची 31 लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'अन्य शेतकऱ्यांची फसवणूक झाली असल्यास संपर्क करण्याचे पोलिसांचे आवाहन'

दरम्यान, एकशिंगे यांनी काही शेतकर्‍यांना त्यांच्या मालाच्या रकमेचे धनादेशही दिले होते. मात्र, ते धनादेश बँकेत वटले नाही. दरम्यान, शेवडी गावासह अन्य 15 शेतकर्‍यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या दोघा भामट्यांचा शोध सुरू आहे. अन्य कोणाची अशी फसवणूक झाली असेल तर त्यांनी जिंतूर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियातील बिग बॅश क्रिकेट स्पर्धेवर परभणीत सट्टा, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

हेही वाचा -गंगाखेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा, 2 लाख 6 हजारांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.