ETV Bharat / state

जिंतूर : विहिरीत उडी घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

author img

By

Published : Nov 5, 2020, 10:47 PM IST

आर्थिक विवंचनेतून स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेत एका 60 वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.
जिंतूर पोलीस ठाणे
जिंतूर पोलीस ठाणे

परभणी - जिंतूर तालुक्यातील पाचेगांव येथे एका 60 वर्षीय शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याने कर्जाची परतफेड कशी करावी, या आर्थिक विवंचनेतून स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (दि.3नोव्हेंबर) घडली असून, या प्रकरणी आज (दि. 5 नोव्हेंबर) जिंतूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रामभाऊ बहिरट असे या शेतकऱ्याचे नाव आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील जिंतूर-औंढा महामार्गालगतच्या पाचेगांव शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके पूर्णतः नष्ट झाल्याने रामभाऊ बहिरट हे चिंतेत होते. डोक्यावरील कर्जफेडीच्या विवंचनेत त्यांनी मंगळवारी मध्यरात्री स्वतःच्याच शेतामधील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

'दुसऱ्या दिवशी आढळला मृतदेह'

कुटुंबीयांनी त्यांचा परिसरात एक दिवस शोध घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी रामभाऊ यांचा मृतदेह त्यांच्या भावाला विहिरीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर गावातील छत्रभुज ससे आणि इतर ग्रामस्थांच्या मदतीने हा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा धम्मपाल बहिरट यांच्या तक्रारीवरून जिंतूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रामभाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.

हेही वाचा - परभणी : जिंतूरात गुटखा जप्त, एकूण 4 लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.