पालघर - तौक्ते चक्रीवादळाचा मोठा फटका जिल्ह्यातील किनारपट्टीभागातील पानवेली व केळी बागायतदारांना बसला आहे. पालघर तालुक्यातील केळवे-माहीम परिसरातील पानवेली, केळी बागायतदार व भाजीपाला लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे तौक्ते चक्रीवादळामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
हेही वाचा - अखेर उमटे धरणातील गाळ काढण्याच्या कामाला सुरूवात
केळवे, माहीम व आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पानवेली, केळी व नारळ आदींची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. त्याचप्रमाणे या भागात इतर भाजीपाल्यांचीही लागवड केली जाते. येथे लागवड होणाऱ्या पानांची देशभर निर्यात केली जाते. सहकारी व खासगी संस्थांमार्फत माल संकलित करून कोट्यावधींची आर्थिक उलाढाल होते. मात्र, कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून येथील शेत मालाला भाव नाही. त्यामुळे, आधीच कंबरडे मोडले असताना आता चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे केळवे - माहीम व आसपासच्या परिसरातील पानवेलींचे मंडप, केळीच्या बागा पूर्णपणे जमीनदोस्त झाल्या असून येथील शेतकरी, बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी, बागायतदार यांनी केली आहे.
हेही वाचा - मोदी सरकारने केलेल्या महागाई विरोधात राष्ट्रवादीचे खालापुरात आंदोलन