ETV Bharat / state

गडचिंचले तिहेरी हत्याकांड : आणखी २४ आरोपींना सीआयडीने केली अटक; ५ अल्पवयीनांचा समावेश

author img

By

Published : Dec 24, 2020, 9:57 AM IST

Updated : Dec 24, 2020, 10:29 AM IST

देशभर गाजलेल्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले साधू हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी २४ आरोपींना बुधवारी अटक केली. यातील १९ आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

Gadchinchle triple murder case
गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण

पालघर - जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर-दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालक अशा तिघांची हत्या केली होती. या तिहेरी हत्या प्रकरणात सीआयडीने आणखी २४ आरोपींना अटक केली आहे. यात ५ अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. यातील १९ आरोपींना बुधवारी डहाणू न्यायालयात हजर करण्यात आले असता, डहाणू न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग एम.व्ही. जावळे यांनी, आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. ५ अल्पवयीनांना भिवंडी येथील बाल सुधारगृहात पाठवण्यात आले.

काय आहे गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरण -

१६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथे चोर-दरोडेखोर असल्याच्या संशयातून जमावाने हल्ला करत दोन साधू व वाहनचालकांना ठार मारले होते. हे तिहेरी हत्याप्रकरण देशभर चर्चेचा मुद्दा बनले होते. संपूर्ण प्रकरण हाताळत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. त्यानंतर गडचिंचले तिहेरी हत्याकांडाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागामार्फत करण्यात आला. याप्रकरणात आतापर्यंत कासा पोलीस ठाण्यातील २ पोलीस अधिकारी व ३ कर्मचाऱ्यांचे निलंबन तसेच ३५ कर्मचाऱ्यांची जिल्ह्यात अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ७ मेला गडचिंचले येथील घटनास्थळाचा दौरा केला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. गडचिंचले हत्याकांड प्रकरणात कासा पोलीस ठाण्यात दाखल तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत तीन स्वतंत्र दोषारोपपत्र गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले आहेत.

यापूर्वी मिळाला आहे ५४ आरोपींना जामीन -

२७ नोव्हेंबरला प्रकरणातील ५४ आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. ठाणे विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. पी. जाधव यांनी या प्रकरणातील ५४ आरोपींची १५ हजाराच्या जामीनावर सुटका करण्याचे आदेश दिले होते. आरोपींच्यावतीने अपील करताना वकील अमृत अधिकारी आणि अतुल पाटील यांनी या घटनेत या आरोपींची काही भूमिका नाही आणि केवळ संशयाच्या आधारेच त्यांना अटक केली असल्याचा युक्तिवाद न्यायालयात केला होता.

Last Updated : Dec 24, 2020, 10:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.