ETV Bharat / state

'कृषी कायदे रद्द, पण आंदोलन मागे घेणार नाहीत'; राकेश टिकैत म्हणाले...

author img

By

Published : Nov 19, 2021, 12:08 PM IST

Updated : Nov 19, 2021, 12:17 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले. शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. शेतकरी कायदे रद्द करण्याचे जाहीर झाले असले तरी तात्काळ आंदोलन वापस घेत नसल्याचं शेतकरी आंदोलनाचे प्रमुख राकेश टिकैत यांनी म्हटलं आहे.

Rakesh Tikait
राकेश टिकैत

पालघर (महाराष्ट्र) - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) तिन्ही कृषी कायदे (Farm Laws) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. देशवासीयांना संबोधित करताना मोदींनी हा निर्णय घोषित केला आहे. राजधानी दिल्लीच्या सीमारेषेवर गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला (Farmers Protest) यश आलं. शेतकऱ्यांच्या विजयाचं देशभरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. मात्र, तात्काळ आंदोलन वापस घेत नसल्याचं शेतकरी आंदोलनाचे प्रमुख राकेश टीकैत यांनी म्हटलं आहे. सध्या राकेश टिकैत (Rakesh Tikait) महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात आहेत.

कृषी कायदे रद्द झाल्यावर शेतकरी आंदोलनाचे प्रमुख राकेश टिकैत यांची प्रतिक्रिया

शेतकरी आंदोलनाचा प्रमुख चेहरा असलेले शेतकरी नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. राकेश टिकैत यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आंदोलन तात्काळ वापस घेतलं जाणार नाही. आम्ही त्या दिवसाची वाट पाहत आहोत, ज्या दिवशी संसदेत कृषी कायदे रद्द केले जातील. तसेच सरकार MSP सह शेतकऱ्यांच्या अन्य मुद्द्यांवर देखील चर्चा करेल, असं राकेश टिकैत म्हणाले.

शेतकरी आंदोलन बांधून ठेवण्यात राकेश टिकैत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कायदे रद्द होणार नाहीत. तोपर्यंत मागे हटणार नाही, वेळ आली तर शेतकऱ्यांसाठी आत्महत्या करेल, असा इशाराही राकेश टिकैत यांनी दिला होता. आज शेतकऱ्यांच्या प्रयत्नांना मोठं यश आलं आहे. मात्र, आंदोलन सुरू झाल्यापासून अनेक शेतकऱ्यांचा बळी गेला आहे. जवळपास 600 वृद्ध शेतकऱ्यांचा आंदोलनात मृत्यू झाला आहे.

तीन कृषी कायदे मागे घेणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर शेतकऱ्यांनी जल्लोष केला. आंदोलक शेतकऱ्यांनी एकमेकांना जिलबी वाटून आपला आनंद व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने 20 सप्टेंबर 2020 रोजी कृषी क्षेत्राशी संबंधित तीन कायदे मंजूर केले होते. यानंतर केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकरी एकवटले होते.

रद्द करण्यात येणाऱ्या तीन कायद्यांची नावं -

  • शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, 2020
  • शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, 2020
  • अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, 2020
Last Updated : Nov 19, 2021, 12:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.