दिंडोरी ( नाशिक ) शेतकऱ्यांनी सत्ता आणि व्यवस्था यांच्या विरुद्ध संघर्ष केला नाही तर कधीच न्याय पदरात पडणार नाही. इतर घटकांप्रमाणे शेतकऱ्यांनाही संघटित होऊन प्रभावी दबाव गट तयार करावा लागेल, तेव्हाच घामाला योग्य भाव मिळेल यासाठी नवीन सदस्य नोंदणी अभियान राबवण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले होते. त्यानुसार संपूर्ण राज्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लाखो शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जोडण्याचा संकल्प केला आहे.
संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी चिंचखेड ता. दिंडोरी या आपल्या गावातून भागवत संधान व सुरेश पगारे या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन, सदस्य नोंदणी करून या अभियानाचा प्रारंभ केला. संपूर्ण राज्यातील संघटनेचे कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेसोबत जोडणार आहेत. पुढील 4 एप्रिलपर्यंत हे अभियान युद्ध पातळीवर राबवले जाणार आहे. अशी माहिती संदीप जगताप यांनी यावेळी दिली.
शेतकऱ्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेत सहभागी होण्याचे आवाहन
आज समाजातील संख्येने कमी असणारे घटक संघटित आहेत. म्हणून त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य होतात. शेतकरी बहुसंख्य असूनसुद्धा संघटित नसल्यामुळे त्याला योग्य न्याय मिळत नाही. आज राजू शेट्टी यांच्या रुपाने महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना प्रामाणिक, लढाऊ व अभ्यासू नेतृत्व मिळाले आहे. अशा नेत्यांसोबत शेतकरी बहुसंख्येने सक्रिय उभे राहिले तर शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मार्गी लागतील. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांच्या भविष्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे. असे आवाहनही यावेळी संदीप जगताप यांनी केले आहे.