ETV Bharat / state

Onion Markets Closed : कांद्याचा निर्यात शुल्क प्रश्न पेटला; नाशिकमधील मनमाड-येवला मार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको

author img

By

Published : Aug 21, 2023, 3:22 PM IST

Updated : Aug 21, 2023, 5:48 PM IST

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के कर आकारल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झालेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र किसान सभेने या बंदला पाठिंबा दर्शवलाय. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात नाशिकमधील शेतकऱ्यांनी मनमाड-येवला मार्गावर रास्ता रोको केलाय.

Onion Markets Closed
कांद्याचा निर्यात शुल्क प्रश्न पेटला

आंदोलन करताना शेतकरी

नाशिक : केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क आकारल्यानंतर राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलंय. तसेच नाशिक जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांनी आजपासून बेमुदत बंद पुकारलाय. जिल्हा कांदा व्यापारी संघटनेनं हा निर्णय घेतलाय. येवला येथील शेतकरी संघटनेकडून मनमाड-येवला मार्गावर रास्ता रोको सुरू करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय.

नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी बाजार समित्या बंद करण्याचं आवाहन केलंय. याला किसान सभा या नाशिक पट्ट्यातील बंदचं स्वागत करत आहे. राज्यभरातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन राज्य आणि केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध केला पाहिजे. - डॉ. अजित नवले, महाराष्ट्र किसान सभेचे नेते

शेतकरी संतप्त : नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंदला नगर जिल्ह्यातील किसान सभेने पाठिंबा दिलाय. केंद्र सरकारच्या सततच्या शेतकरीविरोधी धोरणाचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहनदेखील अजित नवले यांनी केलंय. काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदात होते. किरकोळ बाजारात वाढत असलेले कांद्याचे दर नियंत्रणात राहावे, यासाठी केंद्र सरकारने निर्यात शुल्क 40 टक्के वाढवलंय. यामुळे शेतकरी, व्यापारी, निर्यातदार संतप्त झालेत.

महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न : केंद्र सरकारने शनिवारी कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लागू केल्याची अधिसूचना जारी केली होती. 31 डिसेंबर 2023 पर्यंत हे निर्णय लागू राहणार आहेत. वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कांद्याची मागणी वाढलीय. भविष्यात टोमॅटोसारखी कांद्याची परिस्थिती झाली तर आपल्याकडे पुरेसा साठा शिल्लक असावा, यादृष्टीने देखील हा निर्णय घेण्यात आलाय. सरकारने हा निर्णय घेताना फक्त ग्राहकासोबत शेतकऱ्यांचा देखील विचार करण्यात आलाय. या निर्णयामुळे भारतात कांद्याच्या भावावर कुठलाही परिणाम होणार नसल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी स्पष्ट केलंय.

डॉ. अजित नवले, महाराष्ट्र किसान सभेचे नेते

लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांचे आंदोलन: केंद्र सरकारने निर्यातशुल्कामध्ये 40 टक्क्यांनी वाढ केली असल्याने या निर्णयाच्या विरोधात लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना तसेच शेतकऱ्यांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारने घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

येवल्यात शेतकरी संघटनेचा रास्ता रोको: कांदा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांनी वाढ केल्याच्या निषेधार्थ येवल्यात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गेट समोर मनमाड-शिर्डी महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी केंद्राने घेतलेला निर्णय त्वरित रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली.

बॉर्डरवर पोहचलेल्या मालावरही निर्यात शुल्क: लासलगाव सह इतरही कांदा व्यापाऱ्यांनी आपला कांदा पाठवला असून मुंबई, बांगलादेश, नेपाळ इतर ठिकाणी बॉर्डरवर कांद्याचा माल दाखल झाला. या मालावर देखील निर्यात शुल्क आकारला असून तो रद्द करावा व घेतलेल्या निर्णय देखील मागे घ्यावा या मागणीसाठी कांदा उत्पादक शेतकरी सह आता कांदा व्यापारी देखील आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट नाशिक जिल्ह्यातील सर्व बाजार समितीतील कांदा लिलाव हे बेमुदत काळासाठी बंद ठेवले आहे.

हेही वाचा-

  1. Export Duty Increase On Onion : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही केंद्राकडून कांदा निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क, काय आहे कारण?
  2. Onion Market : कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क; सर्व बाजार समित्या राहणार बेमुदत बंद
Last Updated : Aug 21, 2023, 5:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.