नागपूर - आझाद मैदान येथे सुरू असलेल्या आंदोलनावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात कृषी विधेयक येऊन इतके दिवस झाले मात्र कुठलेही आंदोलन महाराष्ट्रात झाले नाही. काही पक्ष जाणीवपूर्वक ढोंगबाजी करत आहेत, शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कृषी कायद्यांच्या संदर्भात शेतकऱ्यांना चुकीच्या गोष्टी सांगण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
आता जे लोक या मोर्चाच्या निमित्ताने मंचावर जात आहेत त्यांना माझा प्रश्न आहे, की काँग्रेस पक्षाने आपल्या 2019 च्या जाहीरनाम्यात म्हटले होते की बाजारसमित्या रद्द करा आणि आम्ही सत्तेत आलो तर बाजारसमित्या रद्द करू त्यांनी आता उत्तर दिले पाहिजे. 2006 साली कंत्राटी शेतीचा कायदा त्यांनी का मंजूर केला याचे उत्तर दिले पाहिजे. 2020 पर्यंत तो कायदा सुरू आहे. त्यांना महाराष्ट्रातीला कायदा चालतो मग केंद्राचा का नाही, ही ढोंगबाजी का?, असा प्रश्न त्यांनी राज्यकर्त्यांना विचारला आहे.
विरोधाच्या नावावर ढोंग
महाराष्ट्रात थेट खरेदीचे लायसन्स काँग्रेस राष्ट्रवादीने दिले, चिखली बाजार समितीमध्ये थेट खरेदीचे अधिकार कार्पोरेटला दिले, केंद्र सरकार तर ते देखील देत नाही, ही केवळ ढोंगबाजी करत आहे. शेतकऱ्यांचा या मोर्च्याला काहीही पाठिंबा नाही, उलट शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने तर या कृषी कायद्यांचे स्वागत केले आहे असेही फडणवीस म्हणाले आहेत.
महाविकास आघाडीचा पाठिंबा
महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून केंद्राच्या शेतकरी कायद्याला विरोध करण्यासाठी शेतकरी आणि मजूर मुंबईच्या आझाद मैदानात एकटवली आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांच्या मंचावर उपस्थित असणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी आधीच जाहीर केलं आहे की, ते शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. मात्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शेतकरी मंचावर थेट न जाता व्हर्चुवल माध्यमातून किंवा फोनद्वारे शेतकऱ्यांशी संवाद साधणार असल्याची माहिती मिळत आहे. तर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हे नेते थेट भेट घेणार आहेत. सकाळपासूनच शेतकरी नेत्यांचे भाषण मंचावरून सुरू होणार असून महाविकास आघाडीचे येणारे नेते ही शेतकऱ्यांचा संबोधन करणार आहेत. दुपारी शेतकरी राज्यपालांची भेट घेण्यासाठी राजभवनच्या दिशेने कूच करून आपले निवेदन राज्यपालांना देणार आहेत.
हेही वाचा - शेतकऱ्यांना पोलीस आझाद मैदानातच रोखून धरणार?