ETV Bharat / state

Owaisi on love jihad : महाराष्ट्रात किती लव्ह जिहाद झाले डेटा उघड करा, औवेसींचे राज्य सरकारला आव्हान

author img

By

Published : May 28, 2023, 10:34 AM IST

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नागपुरात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. महाराष्ट्रात किती लव्ह जिहाद झाले याचा डेटा सरकारने जाहीर करावा असे आव्हानही औवेसींनी दिले आहे.

असदुद्दीन ओवैसी
असदुद्दीन ओवैसी

नागपूर: नागपुरातील सभेत ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यातील राजकारणावर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडीवर शरसंधान करताना ओवैसी म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणजे तिहेरी लग्न. यात नवरी कोण,नवरदेव कोण हे कळत नाही. तसेच अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीवरही त्यांनी टीका केली. याचबरोबर ओवैसी यांनी राजकीय पक्षांवर टीका केली. भारतीय जनता पक्ष, काँग्रेस,राष्ट्रवादीसह सर्व पक्ष मुसलमानांचा उपयोग फक्त मतांसाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते नागपुरातील सभेत बोलत होते.

ताजुद्दिन बाबाच्या नागपूरला आलो : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची नागपुरात जाहीर सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर त्यांनी भाजपसह आरएसएसवर जोरदार टीका केली. सभेत बोलताना औवेसी म्हणाले की, मी जेव्हा इकडे यायला निघालो तेव्हा मला कोणीतरी विचारले की तुम्ही कुठे चालले, तर मी सांगितले की नागपूरला चाललो आहे. तर ते म्हणाले आरएसएसच्या नागपूरला चालले आहात का? तर मी म्हणालो नाही, मी ताजुद्दिन बाबाच्या नागपूरला चाललो आहे. मी त्या नागपूरला जात आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दीक्षाभूमी आहे.

पट्टेवाटपात मुस्लिमांवर अन्याय: यावेळी त्यांनी आपल्या भाषण शैलीवरुनही विधान केले. लोक म्हणतात की मी जेव्हा भाषण देतो तेव्हा ते भडकाऊ भाषण असतं. मला याची काहीचं फिकर नाही मात्र,मी जे काही बोलतो ते स्पष्ट आणि खरं बोलतो. सरकारने येथे अनेक झोपडपट्ट्यांना पट्टेवाटप केली आहे, मात्र जिथे मुस्लिम बहुल वस्ती आहे तिथे लोकांना पट्टेवाटप केले नाही. नागपुरात दोन विकास प्राधिकरणे आहेत एक नागपूर महानगरपालिका आणि दुसरे म्हणजे नागपूर सुधार प्रण्यास. दलित आणि मुस्लिम वस्त्या आहेत तिथे विकास होत नाही. पिण्याचे पाणी स्वच्छ येत नाही. जेव्हा तुम्ही विकासाच्या नावावर कर घेतात तेव्हा तुमची ती जबाबदारी आहे, की तुम्ही सर्वांना एक समान न्याय द्यावा. आम्ही पूर्ण सिस्टमला आव्हान देत आमचा आवाज बुलंद करत आहोत. महाराष्ट्रात जातीय दंगली उफाळून आणल्या जात आहेत. मालेगाव, अमरावती, नगर, औरंगाबाद इत्यादी ठिकाणी या दंगली घडवण्यात आणल्या. अकोल्यात मज्जिदवर हल्ला करण्यात आला पुस्तके जाळण्यात आली. अकोल्यामध्ये दंगा झाला मात्र तिथले पोलीस अधीक्षक मुस्लिमच्या कार्यकर्त्यांना भेटायलाही तयार नाहीत.

किती लव्ह जिहाद झाले डेटा उघड करा: तुम्ही लग्न करत नाही, ठीक आहे मात्र, कबाबमध्ये हड्डी तर बनू नका. डेटा आणून सांगा की किती लव जिहाद झाले. मुख्यमंत्री तुमचा आहे, सरकार तुमचे आहे. डेटा आणा महाराष्ट्राच्या जनतेसमोर उघड करा. युनिफॉर्म सिविल कोडबाबत कोणी बोलत नाही. जन आक्रोश मोर्चे झाले. मात्र उद्धव ठाकरे काहीच बोलले नाही. शरद पवारही काही नाही बोलले. तुम्ही मला जेवढ्या शिव्या द्या त्याचा मला काही फरक पडत नाही.

तुम्ही किती वेळ धोका देणार: सेक्युलररिझमच्या नावावर 1953 ते 1964 पर्यंत जे दंगे झाले त्याचे माझ्याकडे चार्ट आहे. त्यात सर्वाधिक मरणारे मुसलमान होते. तुम्ही सेक्युलरिझमची गोष्ट करता. मी नेहमीचे राजकीय सेक्युलरमच्या विरोधात आहे. याचा वापर मुसलमानांना कमजोर करण्यासाठी करण्यात आला. मुसलमानांना बेघर करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. आतंकवादी कायद्यात मुस्लिम तरुणांना टाकून कमजोर करण्यासाठी याचा वापर करण्यात आला. सर्व समाजाची लीडरशिप होऊ शकते तर मग दलित आणि मुसलमानांची लीडरशिप कधीही होऊ शकत नाही का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुस्लिमांना स्वतःचे हक्क मिळवून देण्यासाठी एएमआय याला मजबूत करा. लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही एमआयएमला मजबूत करणार नाही तेव्हापर्यंत तुमचे प्रॉब्लेम सुटणार नाहीत.

उच्च शिक्षणातुन मुस्लिम तरुण बाहेत पडत आहेत: देशात मुस्लिम समाजातील तरुण उच्च शिक्षण घेत नाहीत अशी ओरड सुरू आहे. हे खरे आहे दरवर्षी लाखो तरुण उच्च शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून बाहेर पडत आहेत. याकडे केंद्र किंवा राज्य सरकार लक्ष देण्यासाठी तयार नाहीत. उत्तर प्रदेशात 58 हजार मुले उच्च शिक्षणातून बाहेर निघाले. महाराष्ट्रात 15 हजार मुले उच्च शिक्षणातून बाहेर पडले आहेत. मात्र, तेलंगणा राज्यात मुस्लिम तरुणांच्या शिक्षण टक्केवारीत वाढ झाली आहे. सरकार शिक्षण देत नाही म्हणून मुस्लिम मुले-मुली शिक्षण घेत नाहीत. तेलंगणामध्ये 65% मुस्लिम मुले-मुली शिक्षण घेत आहे. मुसलमानांना कधी गायीच्या नावावर मारले जाते तर कधी इतर कारणांनी मारले जाते. एक भयाचे वातावरण तयार करण्यात आले आहे.

हेही वाचा -

  1. BJP Vs Shinde Group : भाजपकडून शिंदेंच्या सेनेवर दबाव अस्त्र; आगामी निवडणुकीत जागा वाटपात मिळणार दुय्यम स्थान
  2. Asaduddin Owaisi : संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन 'यांनी' करावे, पहा काय म्हणाले ओवैसी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.