मुंबई - शिवसेना आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचे खासदार आणि नेते संजय राऊत यांनी राजभवन फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, अशी घणाघाती टीका केली आहे. देशभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याने अद्याप विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झाल्या नाहीत. राऊत यांच्या ट्विटनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करून राऊत यांनी उत्तर दिले आहे. घटनात्मक महत्वाचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा खडा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे.
मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर सहा महिन्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधीमंडळाचे सदस्य होणे क्रमप्राप्त आहे. पण मंत्री मंडळाने राज्यपाल नियुक्त सदस्य होण्यासाठी ठाकरे यांची शिफारस केली असताना राज्यपाल कोश्यारी यांनी अद्याप याबाबत निर्णय घेतला नाही. ही बाब शिवसेनेच्या जिव्हारी लागली असून याबाबत सेनेचे खासदार राज्यपाल कोश्यारींना लक्ष्य करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधी मंडळाचे सदस्य होण्यापासून रोखण्यासाठी भाजपकडून राज्यपालांना हाताशी धरून राजकारण केले जात असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा होऊ नये, का माहीत नाही पण आज निर्लज्ज तत्कालीन आंध्रप्रदेशचे राजपाल रामलाल यांची आठवण होत असल्याचे ट्विट राऊत यांनी केले आहे.
राऊत यांच्या ट्विट नंतर भाजप नेते आशिष शेलार यांनीही ट्विट करून राऊत यांनी उत्तर दिले आहे. घटनात्मक महत्वाचे पद असणाऱ्या महामहिम राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा खडा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. राजभवनाकडे तोंड करुन पत्रपंडित काहीतरी बोलले म्हणे...काय होतं ते ? तुम्ही जेव्हा दोन नावे मित्र पक्षाची सूचविली त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे नाव राज्यपालांना का सुचवले नाही?. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांना का उमेदवारी दिली गेली नाही? आपण हे विसरलो...हे आता सांगायचे आहे की, राज्यपालांवर आता दबाव आणायचा आहे? येथे पत्रपंडित बोलायला लागले की, डराव-डराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते. समजनेवाले को इशारा काफी है.. असे प्रतिउत्तर शेलार यांनी दिले. तसेच राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. दबाव कशाला आणत आहात? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना, मग आता लोकशाहीने वागा... पत्रपंडितांनी अकलेचे तुणतुणं वाजवण्याची काय गरज? राजभवनाच्या नावाने बोंबा मारायला आता शिमगा आहे का? असा सवालही शेलार यांनी केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्य पदावरून भाजप आणि सेनेमध्ये ठिणगी पडली असून पुढील काळात हा वाद अधिकच चिघळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.