ETV Bharat / state

दक्षिण मुंबईची जागा आमचीच, नवीन परंपरेनुसार मिलिंद देवरांनी पक्ष बदलला - संजय राऊत

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 1:18 PM IST

Sanjay Raut today News
Sanjay Raut today News

Sanjay Raut today News विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ठाकरे गटाच्या विरोधात दिलेल्या निकालावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. विधानसभा अध्यक्ष यांच्याविरोधात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे 16 जानेवारीला पत्रकार परिषद घेणार असल्याची त्यांनी मुंबईत आज माध्यमांशी बोलताना माहिती दिली. काँग्रेसला माजी खासदार मिलिंद देवरा यांनी सोडचिठ्ठी दिलीय, यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिलीय.

मुंबई Sanjay Raut today News - शिवसेना अपात्र आमदार प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला निकाल शिवसेना ठाकरे गटाच्या जिव्हारी लागला आहे. अद्यापही यातून ठाकरे गट सावरलेला नाही. याच कारणानं १६ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे जनतेच्या न्यायालयात महापत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिली. यावेळी खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला.

खासदार संजय राऊत म्हणाले, " विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या बाबती दिलेल्या निकालानं संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर पूर्ण देशात संताप व चीड निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्षांचे पुतळे जाळले जात आहेत. तिरडीवरून त्यांची अंत्ययात्रा काढली जात आहे. ही लोकशाहीची अंत्ययात्रा आहे. राज्यघटना पायदळी तुडवली आहे, अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहेत. अत्यंत खोटेपणाचा कळस म्हणजे हा निकाल आहे. महाराष्ट्रात विधानसभा अध्यक्षांची अशा पद्धतीची अंत्ययात्रा निघाली नव्हती. विधानसभा अध्यक्षपद हे संवैधानिक पद आहे. या पदावरील व्यक्ती कधीच पक्षपाती नसते. परंतु राहुल नार्वेकर यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केलं आहे".


देशाच्या इतिहासातील पहिली खुली पत्रकार परिषद - ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते राऊत म्हणाले, " राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाची चिरफाड करणारी महापत्रकार परिषद उद्धव ठाकरे १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता वरळी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स डोम सभागृहात घेणार आहेत. देशाच्या इतिहासातील अशी पहिली खुली पत्रकार परिषद जनतेच्या न्यायालयात उद्धव ठाकरे घेणार आहेत. विधानसभा अध्यक्षांबाबत जनतेच्या मनात इतका राग का आहे. या सर्व बाबींचा खुलासा या महापत्रकार परिषदेत होणार आहे. यासाठी सर्व स्तरातील मान्यवर लोक उपलब्ध असतील. तसेच कायदेशीर क्षेत्रातले प्रमुख लोकसुद्धा उपस्थित असतील. यासाठी जनतेला आमंत्रण देण्यात आलं आहे. जनतेच्या न्यायालयात निकालपत्राची चिरफाड होणार आहे", याबाबत अधिक माहिती उद्धव ठाकरे देणार असल्याचंही खासदार राऊत यांनी स्पष्ट केलं.



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष चोरीचा आहे. हिंमत असेल तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करा. पक्ष उभा करून मग बोलावं. कुणी काकाचा पक्ष चोरतो आहे तर कुणी दुसऱ्या बापाचा पक्ष चोरतो आहे. हे सर्व दिल्लीतील बापाच्या ताकदीवर पक्ष चोरले जात आहेत. आमचाच पक्ष खरा असून तो जागेवर आहे. म्हणून आमचे दौरे होत आहेत. आमचे कार्यकर्ते, शिवसैनिक जागेवर आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीच उद्धव ठाकरे यांचे दौरे होत आहेत. मुख्यमंत्र्यांनी अगोदर स्वतःचा पक्ष स्थापन करून दाखवावा, मगच टीका करावी- ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत



दक्षिण मुंबईची जागा आमचीच- काँग्रेस नेते, माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला आहे. या मुद्द्यावर राऊत यांना विचारले असता," मला याबाबत काहीच वाटत नाही. हा महाराष्ट्र आहे. जर कोणी निवडणूक लढवण्यासाठी, जागा जिंकण्यासाठी पक्ष बदलत असेल तर राज्यात एक नवीन परंपरा सुरू झाली आहे. त्या परंपरेनुसार ते पक्ष बदलत आहेत. त्यावर काँग्रेस पक्षानं भूमिका घ्यावी. मी त्यावर काही बोलणार नाही. माझा त्याच्याशी काही संबंध नाही. परंतु दक्षिण मुंबईची जागा आमचीच आहे", असं खासदार राऊत यांनी ठामपणानं सांगितलं.



भाजपानं हिंदूंची माफी मागावी- संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्यावरही टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, 'राणे सांगतात की, शंकराचार्यांना काय समजते?' परंतु देशातील ४ पिठाच्या शंकराचार्यांनी राम मंदिराबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. राम मंदिर अर्धवट झाले असताना त्याची प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, असे ते म्हणाले आहेत. ते वेद, शास्त्र, पुराण यातील तज्ज्ञ असल्यानं राणे यांनी हे विधान करून समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांनी फक्त शंकराचार्यांचा नाही तर समस्त हिंदूंचा अपमान केला आहे. याप्रकरणी २२ जानेवारीपूर्वी भाजपने हिंदूंची माफी मागावी", अशी मागणीसुद्धा ठाकरे गटाचे नेते राऊत यांनी केली आहे.

हेही वाचा-

  1. उद्धव ठाकरे, संजय राऊत बकवास माणसं; शंकराचार्यांचं हिंदू धर्मात योगदान काय ? नारायण राणेंचा सवाल
  2. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका; संजय राऊतांची आगपाखड
  3. शिवसेनेच्या निकालानंतर विरोधी पक्षातल्या नेत्यांकडून जोरदार टीका, वाचा कोण काय म्हणाले?
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.