ETV Bharat / state

Sai Resort Construction Case: दापोली येथील 'साई रिसॉर्ट' बांधकाम प्रकरण; आरोप पत्रातून माजी मंत्री अनिल परबांचे नाव वगळले

author img

By

Published : May 9, 2023, 7:51 PM IST

दापोली येथील कथित 'साई रिसॉर्ट'चे बांधकाम हे पर्यावरण कायद्याला डावलून झालेले आहे. तसेच यामध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहार संदर्भात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री आणि आमदार अनिल परब यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ('ईडी') आरोप ठेवला होता; 'ईडी'ने दाखल केलेल्या 4 हजार पानी आरोप पत्रामध्ये जयराम देशपांडे, सदानंद कदम यासह इतर आरोपींची नावे आहेत; परंतु अनिल परब यांचे नाव त्यातून वगळल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sai Resort Construction Case
'साई रिसॉर्ट' बांधकाम प्रकरण

मुंबई: रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली या ठिकाणी असलेल्या साई रिसॉर्ट या हॉटेलचे बांधकाम पर्यावर नियमांच्या विरुद्ध आणि नियमबाह्य असल्याचा आरोप खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. गेल्या वर्षभरापासून त्यांनी याबाबत अनेक तक्रारी दिल्या होत्या. याप्रकरणी 'ईडी'ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील नेते रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना अटक केली होती. साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचा देखील संबंध आहे, असा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता.

न्यायाधीशांचे मत: मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रेवती मोहिते ढेरे यांनी फेब्रुवारी 2023 मध्ये याबाबत चौकशी करायला काही हरकत नाही; परंतु सक्तीने कोणतीही कारवाई करू नका, असे निर्देश दिले होते. त्यानंतर अनिल परब यांना दिलासा मिळाला; मात्र काल दाखल झालेल्या आरोप पत्रामध्ये अनिल परब यांचे नाव वगळण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. आता सदानंद कदम व जयराम देशपांडे यांचे नाव आरोप पत्रामध्ये मुख्य आरोपी म्हणून आहेत. त्यांची सुनावणी देखील झाली. 'पीएनएलए' न्यायालयाने आरोपपत्राची आज दखल घेत याची नोंद केली.


'ही' आहे प्रकरणाची पार्श्वभूमी: साई रिसॉर्टचे बेकायदा बांधकाम आणि संशयास्पद खरेदी-विक्री प्रकरण राज्यात अनेक दिवसांपासून गाजत आहे. भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. सदानंद कदम हे अनिल परब यांचे व्यावसायिक पार्टनर आहेत. 'ईडी'ने त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच अनिल परब आणि कदम यांच्यात आर्थिक व्यवहार नियमबाह्य रीतीने झाले, हा आरोप देखील केला होता. त्यामुळे 'ईडी'तर्फे अनिल परब यांची चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यानंतर सदानंद कदम यांना चौकशीसाठी अटक केली होती. यानंतर दापोली येथील माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना देखील अटक करण्यात आलेली आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या 'पीएमएलए' न्यायालयाने यांची न्यायाधीन कोठडी 19 मे पर्यंत वाढवलेली आहे. यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचे समजते.


आरोप पत्रामध्ये नेमके काय? अनिल परब यांचे नाव आरोपपत्रामध्ये आहे. पण, आरोपी म्हणून नाही. खरे तर या प्रकरणाशी संबंधित हे तब्बल 4000 पानांचे आरोपपत्र आहे. यामधील सर्वांत महत्त्वाचा मुख्य सारांश पुढीलप्रमाणे आहे. त्यानुसार, 2017 मध्ये दापोलीतील विभाश साठे आणि सदानंद कदम यांच्यामध्ये या जमिनीच्या खरेदी-विक्री संदर्भातील व्यवहार निश्चित झाला. या संदर्भात जमीन खरेदी-विक्री करण्याबाबतचा एजंट विनोद डेफलकर यांच्या मार्फत हा संपर्क पार पडला. सदानंद कदम यांच्या कार्यालयामध्ये विभाश साठे यांची 2017 मध्येच भेट झाली होती. एकूण जमीन खरेदी-विक्री संदर्भातील जो सौदा होता, त्याकरिता 1 कोटी 80 लाख रुपये पैकी 80 लाख रुपये रोखीने हस्तांतरित करण्यात आले आहे. सदानंद कदम यांनी सांगितले की, ते अनिल परब यांच्यावतीने ही वाटाघाटी करत आहेत. हा सौदा झाल्यानंतर सदानंद कदम, अनिल परब आणि संबंधित वास्तू विशारद यांच्यात एकत्रित बैठक झाली. यामध्ये वास्तू विशारद यांनी ही जमीन 'सीआरझेड'मध्ये येत असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही बांधकाम कायदेशीररीत्या होऊ शकत नाही, असे म्हटले असल्याचे नमूद आहे.

हेही वाचा:

  1. Rakhi Sawant Brother Arrested : राखी सावंतच्या भावाला ओशिवरा पोलिसांनी केली अटक, 22 मेपर्यंत न्यायालयीन कोठडी
  2. MLA Suspended : आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्याचा अधिकार कोणाला? राहुल नार्वेकरांनी स्पष्टच सांगितले...
  3. Vikhe Patil On New Sand Policy : नवीन वाळू धोरणाबाबत वाळूतस्करांकडून दिशाभूल - महसूल मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.