मुंबई - वरळीत मागील काही वर्षांपासून बीडीडी ( बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट) चाळ, एसआरए (स्लम रिहॅबिलिटेशन अथॉरिटी) आणि जुन्या चाळीच्या पुनर्विकासाचे अनेक प्रकल्प अर्धवट राहिले आहेत. या प्रकल्पात मोठी आर्थिक गणित आहेत. ही सर्व गणिते जुळवण्यासाठी शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघाची निवड केली आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीचे उमेदवार डॉ. सुरेश माने यांनी मंगळवारी केला.
डॉ. माने यांनी मंगळवारी काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडी आणि बीआरएसपी या पक्षाच्यावतीने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवाणी यांच्या हस्ते 'वरळीचा जाहीरनामा' प्रसिद्ध केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेसारख्या सत्ताधारी पक्षाला वांद्रे सोडून वरळीत यासाठी यावे लागले. त्यामागे राजकारण नाही तर मोठे अर्थकारण आहे आणि वरळीतील जनता या लोकांना ओळखून आहे. स्थानिक जनतेचे प्रश्न मला माहित असून मी वरळीकर आहे, त्यामुळे लोक आर्थिक गणितासाठी आलेल्यांना आपली जागा दाखवतील, असे माने यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा - भाजप शेतकऱ्यांच्या संसाराची होळी करतयं, कर्डीलेंना चूकन साथ दिली - शरद पवार
माने यांनी आपल्या जाहीरनाम्यात वरळीच्या एकूण विकासाच्या संदर्भात अनेक मुद्दे मांडले आहेत. त्यात वरळीतील बीडीडी चाळ पुनर्विकास, वरळीतील एसआरए प्रकल्प, वरळीतील धोबीघाट आणि येथे शेकडो वर्षापासून राहत असलेल्या कोळी बांधवांच्या घरांच्या प्रश्नावर त्यांनी हा जाहीरनामा केंद्रीत केला आहे. वरळीतील रहिवाशांना तसेच बीडीडी चाळीत राहत असलेल्या पोलीस कर्मचारी यांना वरळी येथेच त्यांच्या सेवेनंतर मालकीचे घर प्राप्त झाले पाहिजे, असे वरळीकरांच्या मनातील विषय त्यांनी आपल्या जाहीरनाम्यात मांडले आहेत.
हेही वाचा - अच्छे दिन..! नरेंद्र मोदी 2 कोटी, तर देवेंद्र देणार 1 कोटी...
मोदी देशाचे पंतप्रधान आहेत की अंबानींचे - जिग्नेश मेवानी
दरम्यान, आमदार जिग्नेश मेवानी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाचे अश्रू पुसायला जात नाहीत. पूर आला तर त्यावर साधे ट्वीट करायला त्यांना वेळ मिळत नाही, परंतु प्रियांका चोप्रा सोबत फोटो काढायला वेळ असल्याची टीका मेवानी यांनी केली. आज बीएसएनएल बुडत असताना मोदी मात्र अंबानींच्या जिओसाठी काम करताना दिसत आहेत. त्यामुळे हे देशाचे पंतप्रधान आहेत की अंबानी यांचे, असा प्रश्न आज पडला आहे. आज देशात आर्थिक स्थिती अत्यंत भयावह बनत चालली असताना हे विदेशात जाऊन सर्व काही अलबेल असल्याचे सांगत आहेत. महाराष्ट्रात १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, परंतु मोदी यांना या शेतकऱ्यांवर बोलण्यासाठी वेळ नाही, अशी टीका मेवानी यांनी करत राज्यात भाजप सेनेचे सरकार उलथून टाका असे, आवाहन केले.