ETV Bharat / state

नानांनी आधी काँग्रेसमधील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घ्यावी - नवाब मलिक

author img

By

Published : Jul 12, 2021, 5:12 PM IST

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांनी पाळत ठेवल्याबाबतचे वक्तव्य केले आहे, असा टोला राष्ट्रावादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे.

नवाब मलिक
नवाब मलिक

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून माझ्यावर पाळत ठेवली जाते. काँग्रेस पक्षाकडून मी दिलेला स्वबळाच्या नाऱ्यामुळे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या पायाखालून वाळू सरकली, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. मात्र, आता त्यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षामध्ये पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सुशील कुमार शिंदे हे माजी मुख्यमंत्री आहेत. त्यांच्याकडून या सर्व बाबींची माहिती घ्यावी, असा टोला नवाब मलिक यांनी नाना पटोले यांना लगावला आहे.

माहितीच्या अभावामुळे नानांचे आरोप

माझ्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून पाळत ठेवली जाते, असे वक्तव्य नाना पटोले यांनी केले आहे. मात्र, हे वक्तव्य करत असताना नाना पटोले यांनी माहिती तपासायला हवी होती. त्यांच्याकडे माहितीचा अभाव असल्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केल्याचे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सुरक्षेच्या दृष्टीने राज्यातील सर्वच महत्त्वाच्या नेत्यांवर आणि त्यांनी केलेल्या दौऱ्यावर गृहखाते लक्ष ठेवत असते. त्या नेत्यांची माहिती घेण्याचे काम गृह खात्याकडून रोज करण्यात येते. यांमुळे नेत्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षा यंत्रणेला अलर्ट राहता यावे, म्हणून ही माहिती संकलित केली जाते. याबाबत नाना पटोले यांना माहित नसेल तर, काँग्रेस पक्षामध्ये असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून त्यांनी माहिती घ्यायला हवी होती, असेही नवाब मलिक यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा - व्यापाऱ्यांना राजकीय लोकांकडून उकसवले जात आहे - महापौर किशोरी पेडणेकर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.