मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिंदे गटाच्या सर्व आमदार, खासदार नेत्यांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले आहेत. दौऱ्यात भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाल्याने शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. आजवर महाष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते गेल्या अनेक वर्षांत अयोध्येला गेल्याचे पाहिले नाही. आम्ही सातत्याने जात आलो आहोत. तेव्हा भाजपवाले आमच्या सोबत कधीही नव्हते. येथे श्रीराम मंदिर व्हावे, यासाठी शिवसेनेने संघर्ष केला आहे. अयोध्येत जाणे वेगळा आनंद असतो. परंतु, आता गेलेले श्रीरामाचे सत्य वचन कुठून आणणार, असा प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.
यांच्या डोक्यातला किडा नवा नाही: महाराष्ट्रात मागील ७२ तासात गारपिटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाल आहे. सरकारने अधिवेशनकाळात काही घोषणा केल्या होत्या. मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून धर्माच्या नावाने पर्यटनाला निघाले असून हे ढोंग आहे. लवकरच उघडे पडेल. आता शिंदे सरकारला अयोध्येतील साधू संतांचे आशीर्वाद देत आहेत. कालपर्यंत त्यांचा आशीर्वाद बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंना होता. शिंदे गटाकडून बेईमानी, सत्तेची बीजे मागील साडे तीन वर्षांपासून रुजवली जात होती. माझ्या माहितीप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण असतानाही हा प्रकार सुरू होता. तेव्हा काही बैठका देखील झालेल्या. यांच्या डोक्यातला किडा नवा नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
जेपीसीच्या मागणीवर कायम: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीवरुनही संजय राऊत यांनी निशाणा साधला. खोटी डिग्री ही काही प्रतिष्ठेचे लक्षण नाही. त्यांच्या त्या भूमिका असू शकतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह अनेकांनी गोष्ट समोर आणल्या आहेत, असे राऊत म्हणाले. गौतम अदानीच्या मुद्द्यावरुनही संजय राऊतांनी प्रश्न उपस्थित केला. अदानी यांच्यावरुन प्रश्न जे उपस्थित झाले आहेत. त्याचे सत्य समोर येणे गरजेचे आहे. आमची जेपीसीची मागणी कायम आहे. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत, त्यांची वेगळी मते आहेत. उद्योगपतींना स्वातंत्र्य दिले पाहिजे, त्यांची लिबरल भूमिका आहे. मात्र त्याचा अर्थ असा नाही ना की त्यांच्या भ्रष्टाचाराला पाठिंबा दिला पाहिजे. अदानी संबंधी चौकशी प्रकरणी त्यांनी विरोध केला नसल्याचे संजय राऊत म्हणाले.
अदानींना मोकळे सोडण्यात येत असल्याची टीका: पवार साहेबांनी काही भूमिका मांडल्या असतील तर त्यात आता चर्चा करण्याचे कारण काय? अदानी यांच्यावर उद्योगपती म्हणून काही प्रश्न उपस्थित झालेत. तसेच आधी टाटा आणि बिर्ला यांच्याबाबत उपस्थित झाले होते. अनेक उद्योगपतींबाबत असे प्रश्न उपस्थित झाले होते. अनेक उद्योगपतींना मोदी सरकारने तुरुंगात टाकलेले आहे. अनेक महत्त्वाची उद्योगपती तुरुंगात आहेत. कारण, त्यांनी देखील गौतम अदानीप्रमाणे चुकीचे गुन्हे कामे केली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची गुन्हे गौतम अदानींवर का नाही? हाच प्रश्न आहे. या देशातील अनेक उद्योगपती आणि राजकारण्यांना टार्गेट केले जात आहे. परंतु, अदानींना मोकळे सोडण्यात येत आहे, हा प्रश्न आहे. जो न्याय अदानींना तो इतर उद्योगपतींना द्या. पवार साहेबांनी यावर भूमिका घ्यावी, अशी माझी मागणी असल्याचे संजय राऊत म्हणाले.
तोच न्याय अदानीला का नाही? विरोधी पक्षातले नेते सत्ताधाऱ्यांच्या टार्गेटवर आहेत. गौतम अदानी यासाठी टार्गेट आहे. कारण ते मोदींचे जीवश्च कंठश्च मित्र आहे. मोदींमुळे त्यांची भरभराट होते आहे. त्याचवेळेला अदानींच्या प्रश्नांवर मौन बाळगणे, विरोधी पक्षाला टार्गेट करणे, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, सेना खासदार संजय राऊत, मनिष सिसोदिया, ममता बॅनर्जी, तुमच्याकडे काय सगळे दुधाने आंघोळ करतात का? तोच न्याय आणि कायदा गौतम अदानीबाबत देखील का नाही? हा प्रश्न शरद पवार साहेबांनी देखील विचारायला हवा, असेही संजय राऊत यांनी म्हटले.