मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर भाजपने आता मुंबई महापालिकेकडे आपला मोर्चा वळवला आहे. 7 मार्च 2022 रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर मुंबई महापालिकेतील सर्व पक्षांची कार्यालये सील करण्यात आली होती. त्यातच आता मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना महापालिका मुख्यालयात कार्यालय देण्यात आल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. आमदार आदित्य ठाकरे आणि आमदार जयंत पाटील यांनी आज विधानसभेत विरोध करत यावर आक्षेप घेतला. चुकीचा पायंडा पडत असल्याची तक्रार विधानसभेत केली. याला आता लोढा यांनी उत्तर दिले आहे.
'कार्यालय जनतेसाठी कार्यरत राहणार' : मंगल प्रभात लोढा म्हणाले की, 'महायुती सरकार जनतेत जाऊन काम करणारे आहे. मुंबईतील पालकमंत्री कार्यालय हे जनतेसाठी कार्यरत राहणार आहे. मी घरी बसून किंवा सोशल मीडियावर सरकार चालवत नाही. आम्ही महापालिकेच्या कार्यालयात बसून, नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन, त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहोत', असे ते म्हणाले. 'मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री या नात्याने मी मुंबईत फिरलो, तसेच शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने काम केले', असे त्यांनी स्पष्ट केले.
'..म्हणून पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आले' : मंगल प्रभात लोढा पुढे बोलताना म्हणाले की, 'यापूर्वी पालकमंत्री म्हणून मी मुंबई उपनगरातील सर्व 15 वार्डमध्ये फिरलो आहे. यावेळी 15 हजारपेक्षा अधिक नागरिकांच्या समस्या मला प्राप्त झाल्या. त्यातील 3 हजारपेक्षा अधिक समस्यांचे समाधान देखील केले. त्यातून जनतेच्या हक्काच्या या कक्षाची आवश्यकता अधोरेखित होते. त्याचप्रमाणे मुंबई उपनगरचा पालकमंत्री या नात्याने, विविध बैठकीसाठी अधिकाऱ्यांना मंत्रालयात बोलवावे लागते. हे सर्व सुकर व्हावे, या हेतूने मुंबई महापालिका कार्यालयात पालकमंत्र्यांचे दालन सुरू करण्यात आल्याचे मंत्री लोढा यांनी यावेळी स्पष्ट केले.
'कार्यालयाला विरोध का करत आहेत?' : 'हे कार्यालय यापुढील काळात देखील मुंबई उपनगर जिल्ह्याचे जे पालकमंत्री होतील, त्यांचे कार्यालय असणार आहे. आदित्य ठाकरे यांचे सरकार होते, त्यावेळी मुंबईकरांनी अनेक समस्यांचा सामना केला आहे. त्यामुळे आता नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कार्यालयाला ते का विरोध करत आहेत?', असा प्रश्न मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी विचारला. यासोबतच लोढा यांनी संबंधित अधिकाऱ्यांसह अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थीची सुद्धा पाहणी केली.
हेही वाचा :