ETV Bharat / state

Mangalprabhat Lodha : पावसाळ्यात नाल्यांची नियमित स्वच्छता करा मंत्र्यांची सूचना, मालाडमध्ये झाड पडून एकाचा मृत्यू

author img

By

Published : Jun 28, 2023, 4:56 PM IST

मान्सूनच्या आगमनाच्या पहिल्याच दिवशी मुंबईत कोसळलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले. यावर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतील नाल्यांमध्ये सातत्याने कचरा साचत असल्याने नाले साफ करण्याची गरज असल्याचे लोढा म्हणाले.

Mangalprabhat Lodha
Mangalprabhat Lodha

मुंबई : यंदा उशिराने मान्सून दाखल झाला असला तरी, पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. मुंबईत पहिल्याच पावसाने अनेक ठिकणी सखल भागात पाणी साचले आहे. अंधेरी मिलन सबवे, चेंबूर कुर्ला या ठिकाणीही पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेत, सतत नालेसफाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

महापालिका अधिकाऱ्यांना सूचना : पहिल्याच पावसामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला. यापुढे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागू नये, यासाठी पालिका अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्याचे लोढा यांनी सांगितले. तसेच लोढा यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात जाऊन स्वतः पाहणी केली. नियंत्रण कक्षात सुमारे दोन तास बसून त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. मुंबईतील नागरिकांना पावसाळ्यात पाणी साचण्याच्या त्रासाला सामोरे जाऊ लागू नये, योग्य उपाय योजना कराव्यात अशा सुचना त्यांनी दिल्या. तसेच सरकार, महापालिकेच्या वतीने सर्व प्रयत्न केले जातील असेही लोढा यांनी सांगितले.

सातत्याने नालेसफाई गरजेची : मुंबईतील नालेसफाई महापालिकेने योग्यरीत्या केली होती. मात्र, तरीही मुंबईतील गटरांमध्ये सिवेज ट्रीटमेंट प्लांट नसल्यामुळे वारंवार कचरा जमा होतो. हा कचरा जर वेळीच साफ केला नाही तर, पुन्हा पुन्हा पाणी साचण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी दर चार ते पाच दिवसांनी नाल्यांमधील कचरा साफ केला गेला पाहिजे. तरच पाणी साचण्याच्या समस्येवर तोडगा निघू शकतो. महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी नाला सफाईकडे लक्ष द्यावे, अशा सुचना देखील लोढा यांनी दिल्या आहेत.

झाड पडून एकाचा मृत्यू - पावसात झाड पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात बुधवारी सकाळी झाड कोसळले. ज्यामध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीचा झाडाखाली दबून मृत्यू झाला. कौशल महेंद्र दोशी असे मृत तरुणाचे नाव आहे. मुंबई शहरात बुधवारी सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. मुंबईच्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा - Maharashtra Weather Update: ठाणे, रायगड, रत्नागिरीला आयएमडीचा ऑरेंज अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.