ETV Bharat / state

गेट वे ऑफ इंडियाचा होणार कायापालट, पर्यटन विभागाचा निर्णय

author img

By

Published : Feb 19, 2021, 7:40 PM IST

पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भव्य ऐतिहासिक स्माकाचे जतन, आणि पोलीस सुरक्षा चौक्यांची दुरुस्ती करून एकसंध विकास सुनियोजित पर्यटनस्थळ उभारण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

गेट वे ऑफ इंडियाचा होणार कायापालट
गेट वे ऑफ इंडियाचा होणार कायापालट

मुंबई - पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेल्या गेट वे ऑफ इंडियाचा कायापालट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर भव्य ऐतिहासिक स्माकाचे जतन, आणि पोलीस सुरक्षा चौक्यांची दुरुस्ती करून एकसंध विकास सुनियोजित पर्यटनस्थळ उभारण्यात येणार आहे. राज्य सरकार आणि पालिकेच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली.

दक्षिण मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईची ओळख आहे. त्यामुळे या भागाला विशेष महत्त्व आहे. मुंबईवर झालेल्या ‘२६/११’च्या हल्ल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढविण्यात आली आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देखील आहे. पर्यटक गेट वे ऑफ इंडिया पाहाण्यासाठी गर्दी करत असतात. पर्यटकांच्या सोईसाठी परिसरातील अडथळे हटवून, या परिसराचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. तसेच पर्यटकांच्या दृष्टीने काही महत्त्वपूर्ण सुविधा देखील उभारण्याचा निर्णय पर्यटन विभागाने घेतला आहे.

व्यवस्थापन आराखडा तयार

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि गेट वे ऑफ इंडियाचे स्मारक हे राज्य सरकारच्या पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत येतात. तर आजूबाजूच्या परिसराचा विकास महापालिकेच्या अखत्यारीत आहे. येथील जमीन ही मुंबई पोर्ट ट्रस्टच्या मालकीची आहे. त्यामुळे वर्षभरापूर्वी पर्यटन विभागाने बीपीटी, पोलीस, पालिका, पुरातत्त्व विभाग यांची एकत्रित बैठक घेऊन एकसंध व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ

राज्याच्या पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली हे काम केले जाणार आहे. याकरता सल्लागारही नेमला आहे. नुकतेच या सल्लागाराने गेट वे ऑफ इंडीया परिसराच्या सौदर्यीकरणाबाबत पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना सादरीकरण केले. यावेळी तिकीट खिडक्या, विजेचे खांब, पोलीस चौक्या यांची रचना या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला पूरक कशी ठेवता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच अपंग पर्यटकांसाठी विशेष सुविधा देखील करण्यात येणार आहे. एकूणच हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन स्थळ निर्माण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती पर्यटन विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.