ETV Bharat / state

विमानतळ, कोळसा खाणी सर्व अदानींनाच? टाटांचा उल्लेख करत राज ठाकरेंचा परखड सवाल

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 3:17 PM IST

MNS President Raj Thackeray
राज ठाकरे यांचा सवाल

MNS President Raj Thackeray : धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं कंत्राट अदानी समुहाला देण्यात आलंय. विमानतळापासून ते खाणीपर्यंत सर्व कामं अदानीलाच (Dharavi Redevelopment Project) कसे मिळतात? असा सवाल महाराष्ठ्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच मनसेच्या वतीनं लोकसभेसाठी 22 मतदारसंघात उमेदवार दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

मुंबई MNS President Raj Thackeray : लोकसभा निवडणुका आता तोंडावर आल्या आहेत. सर्वच पक्ष त्या दृष्टीनं तयारी करत असून, आढावा बैठका सुरू आहेत. तर काही पक्ष आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सत्ताधारी पक्षांना कशी टक्कर देता येईल, यासाठी आराखडा आखत आहेत. मात्र, सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती पाहता महाराष्ट्र नवनिर्माण सेना याकडं एक संधी म्हणून बघितलं जात असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे पूर्ण ताकदीनिशी लोकसभेच्या मैदानात उतरले आहेत. याच संदर्भात चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. वांद्रे येथील MIG क्लब येथे ही बैठक पार पडली. यात राज ठाकरेंनी 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी अदानी समूहावर (Dharavi Redevelopment Project) आपली प्रतिक्रिया दिली.

राज ठाकरेंचा महाविकास आघाडीला टोला : शनिवारी महाविकास आघाडीनं धारावी पुनर्विकास प्रकल्पाचं काम अदानी समूहाला मिळाल्यानं त्या विरोधात मोर्चा काढला होता. याबाबत बोलताना राज ठाकरे म्हणाले की, धारावी खूप मोठी आहे. या धारावीचा पुनर्विकास करायचा म्हणजे हा मोठा प्रकल्प असून, इतका मोठा प्रकल्प मुंबईत येतो आणि तो अदानींना मिळतो? असं काय आहे त्या अदानींकडे? विमानतळ अदानींना, कोळसा खाणी अदानींना. आपल्याकडे इतरही उद्योजक आहेत. टाटा आहेत. सरकार टाटा समूहाकडून देखील डिझाईन आणि टेंडर मागवू शकलं असतं. मात्र, त्यांनी तसं केलं नाही. त्यांची अदानी समूहासोबत चर्चा झाली होती. आता या सगळ्या गोष्टीला साधारण दहा महिने झाले असतील. या दहा महिन्यानंतर असं काय झालं की महाविकास आघाडीला आत्ता मोर्चा काढावा लागला?.

केंद्र सरकारवर टीका : यावेळी पत्रकारांनी राज ठाकरे यांना मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधी होईल? असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरे यांनी सांगितलं की, सध्या देशात निवडणूक आयोग, कायदा हे काही नाहीच. गोविंदाचे एक गाणं आहे 'मेरी मर्जी' या प्रमाणेच सर्व काही सुरू आहे. तसेच यावेळी राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवरही जोरदार टीका केली.

राज ठाकरे 22 लोकसभा जागांवर उमेदवार देणार? : वांद्रे येथील आजच्या लोकसभा आढावा बैठकीत राज ठाकरे यांनी राज्यातील 22 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या बैठकीला मुंबई, पुणे, पालघर, नाशिक, रायगड आणि विदर्भ या विभागातील पदाधिकारी उपस्थित होते. ही काही विशेष बैठक नव्हती. निवडणुका तोंडावर आहेत. त्यादृष्टीने राज ठाकरे बैठका घेत असतात. तशीच एक रुटीन बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण महाराष्ट्राचा आढावा घेण्यात आला, अशी माहिती देखील राज ठाकरे यांनी दिली आहे.

हेही वाचा -

1. संसदेच्या सुरक्षा भंगावर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी दिली नोटीस, आज पुन्हा गदारोळ होण्याची शक्यता

2. संसद सुरक्षा भंग प्रकरणात दिल्लीच्या विशेष पथकाकडून लखनौमधील फुटवेअर शोरूम मालकाची तीन तास चौकशी

3. कोल्हापूर : सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतलं अंबाबाईचं दर्शन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.