ETV Bharat / state

Mumbai Water Cut : मुंबईत दोन दिवसात दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय

author img

By

Published : Jun 24, 2022, 8:26 AM IST

Mumbai Water Cut
Mumbai Water Cut

मुंबईला पाणी पुरवठा ( Mumbai Water Supply ) करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठी 10 टक्क्यांच्या खाली आला आहे. त्यामुळे मुंबईत 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय दोन दिवसांत घ्यावा लागणार आहे.

मुंबई - जून महिना संपायला आला तरी मुंबईला पाणीपुरवठा ( Mumbai Water Supply ) करणाऱ्या धरणक्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ९.७६ टक्के पाणी उपलब्ध आहे. हा पाणीसाठा पुढील दीड महिना मुंबईकरांची तहान भागवेल इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत १० टक्के पाणी कपातीचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या जल विभागाचे उपायुक्त अशोक राठोड यांनी सांगितले.

दोन दिवसात पाणी कपातीचा निर्णय - हवामान विभागाने यंदा चांगला पाऊस पडेल अशी शक्यता वर्तवली आहे. ११ जूनला पावसाला सुरुवात झाल्याचे हवामान विभागाने जाहीरही केले. मात्र त्यानंतर मुंबईत किंवा मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. पावसाची रिपरिप तर काही ठिकाणी एखाद दुसरी पावसाची सर येवून जात आहे. त्यामुळे धरण क्षेत्रातील पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. गेल्या वर्षी सातही धरणात २,२१,८९० दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध होता. यंदा १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे. मागील वर्षापेक्षा ८० हजार ६४८ दशलक्ष लिटर पाणी साठा कमी आहे. जुलै अखेरपर्यंत मुंबईकरांची तहान भागेल इतका पाणीसाठा सातही धरणात उपलब्ध आहे. पुढील १५ ते २० दिवसांत धरण क्षेत्रात पावसाने हजेरी लावली नाही, तर मात्र मुंबईत पाणी कपात करावी लागणार आहे. याबाबतचा निर्णय येत्या २ दिवसात घेतला जाईल असे अशोक राठोड यांनी सांगितले.

वर्षाला इतके लागते पाणी - अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३,८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. मात्र २३ जून २०२२ रोजी सातही धरणात १ लाख ६० हजार ८३१ दशलक्ष लिटर पाणी साठा उपलब्ध आहे.

ठाणे भिवंडीकरांनाही झळ! - ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून पावसाने हजेरी न लावल्याने मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे आणि त्यामधून येणारे पाणी ठाणे आणि भिवंडी मार्गे पाईपच्या माध्यमातून येत असल्याने या विभागांना मुंबई महापालिकेकडून रोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा केला जातो.

तलावांतील पाणीसाठा (दशलक्ष लिटर)
तलावाचे नाव पाणीसाठा
मोडक सागर ४६,७५३
तानसा ६,२८९
मध्य वैतरणा १७,९६१
भातसा ६४,२५८
विहार ३,८७८
तुलसी २,१०३


तीन वर्षांचा २३ जूनपर्यंतचा जलसाठा ( दशलक्ष लिटर)
२०२२ - १,४१,२४२
२०२१ - २,२१,८९०
२०२० - १, ४८,०५९

हेही वाचा - Eknath Shinde Old Video Viral : पालकमंत्री शिंदेंचा मुंख्यमंत्र्याच्या सभेतील राजीनामा नाट्याचा व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.