ETV Bharat / state

'अटल सेतू'मुळं फेरी बोट चालकांना बसणार फटका? जाणून घ्या कारण

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 12, 2024, 9:08 PM IST

Sewri Nhava Sheva Atal Setu : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शुक्रवारी) मुंबईत ट्रान्स हार्बर सीलिंकचे उद्घाटन केले. या सीलिंकला अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू असं नाव देण्यात आलं असून, हा देशातील सर्वात लांब सागरी सेतू आहे. मात्र, या सागर सेतूमुळे आता ब्रिटिश काळापासून मुंबईकरांना सेवा देणारे फेरी बोटवाले संकटात आले आहेत. त्यांच्या संघटनेनं आता सरकारकडे मदतीसाठी मागणी केली आहे. (Boat Operators Association)

Nhava Sheva Sea Bridge
न्हावा शेवा

मुंबई Sewri Nhava Sheva Atal Setu : ब्रिटिशांनी मुंबईचं महत्त्व ओळखलं आणि इथे व्यापाराच्या दृष्टीनं त्यांनी भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडिया येथे बंदर बांधली. जी आजही अस्तित्वात आहेत. ब्रिटिश काळात या बंदरांवरती मोठमोठी मालवाहू जहाजे येत आणि लाखोंचा व्यवहार होत असे. त्या काळापासून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, गोवा या भागात जाण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. दळणवळणाची साधनं नव्हती. तेव्हा बोटीनं जाणं हा एकमेव पर्याय इथल्या चाकरमानांकडे होता. ब्रिटिशांनी सुरू केलेली ही जलवाहतूक सेवा आजही सुरू आहे आणि अनेक पर्यटकांचं आकर्षण आहे. मात्र, देशातील सर्वांत लांब अटल बिहारी वाजपेयी नावसेवा सागरी सेतूमुळे ही जलवाहतूक सेवा आता संकटात सापडली आहे. (Trans Harbor Sealink)

तर पर्यटक बोटसेवेकडे पाठ फिरवतील: आजही अलिबाग, एलिफंटा, गोवा या ठिकाणी फिरायला जाणारे हौशी पर्यटक रो रो बोट सेवा आणि फेरीबोट यासारख्या जलवाहतुकीचा पर्याय निवडतात. विस्तीर्ण अशा समुद्रातून आणि मोकळ्या अशा आकाशाखाली फिरणं ही पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरते. पर्यटक या समुद्री मार्गाचा पर्याय निवडण्याचं आणखी एक कारण म्हणजे मागची कित्येक वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्ग आणि या महामार्गात पडलेले मोठमोठे खड्डे. या सागरी मार्गामुळे पर्यटकांचा प्रवास कमी वेळेत, सुखकर आणि आनंदात होत होता. मात्र, आता सागरी सेतूमुळे पर्यटक आपल्या जलवाहतुकीकडे पाठ फिरवतील अशी भीती या फेरीबोट चालकांना आहे.

राज्य सरकारने द्यावी मदत: या फेरीबोट चालकांचं म्हणणं आहे की, ब्रिटिश काळापासून आम्ही मुंबईकरांना आणि इथे येणाऱ्या पर्यटकांना सेवा देत आहोत. समुद्राच्या कुशीत वसलेली गावं आणि मुंबईच्या आजूबाजूला असलेल्या शहरांना जोडण्याचं काम मागाच्या पिढ्यानपिढ्या आम्ही केलं आहे. पण न्हावाशेवा सागरी सेतूमुळे आता पर्यटकांचा वेळ वाचणार आहे. त्यामुळे अनेक जण याच मार्गाने प्रवास करतील. आम्हाला भीती आहे त्याचा परिणाम आमच्या व्यवसायावर होईल. त्यामुळे इथून पुढे पर्यटकांनी या सागरी वाहतुकीकडे पाठ फिरवल्यास आम्ही घर कसं चालवायचं? हा आमच्या समोर मोठा प्रश्न आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्ही वर्षानुवर्ष दिलेल्या सेवेचा विचार करून आम्हाला आर्थिक मदत करावी, अशी मागणी फेरीबोट चालक-मालक संघटनेकडून करण्यात आली आहे.


प्रवासी संख्या ६० टक्के कमी होणार: यासंदर्भात ईटीव्हीशी बोलताना मुंबई जलवाहतूक संस्थेचे सचिव शराफत मुकादम म्हणाले की, "अगोदरच आधुनिक बोटीमुळं आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम पडलेला आहे. त्यानंतर आता देशातील लांब पल्ल्याचा सागरी सेतू प्रवाशांच्या सेवेत आल्यानंतर त्याचा परिणाम देखील आमच्या सागरी वाहतूक सेवेवर होणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने आम्हाला नुकसान भरपाई द्यावी. तर, गेट वे एलिफंटा जलवाहतूक चालक मालक संघटनेचे सचिव किफायत मुल्ला म्हणाले की, "सागरी सेतूमुळे फेरी बोटीचे प्रवासी संख्या ६० टक्के कमी होणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षपणे आमचे मोठे नुकसान होणार आहे. राज्य सरकारने आम्हाला आर्थिक मदत करावी."

कुटुंबीयांचं पोट कसं भरायचं? आजच्या घडीला भाऊचा धक्का, गेटवे ऑफ इंडिया या मुंबईतील दोन महत्त्वाच्या बंदरांवरून इतर ठिकाणी सेवा देणाऱ्या एकूण 145 फेरीबोटी कार्यरत आहेत. या प्रत्येक बोटीवर किमान पाच जण काम करतात. म्हणजे या जलवाहतुकीमुळे ज्यांना रोजगार मिळाला अशांची संख्या 725 इतकी होते. सोबत बोटीची डागडुजी करणारे आणि देखभाल करणारे कामगार जोडले तर हीच संख्या 1200 इतकी होते. न्हावाशेवा सागरी सेतूमुळे किमान 60 टक्के पर्यटक संख्या कमी होईल असा अंदाज या फेरीबोट चालकांचा आहे. त्यामुळे या सागरी वाहतुकीवर अवलंबून असलेल्या 1200 खलाशांच्या कुटुंबीयांचं पोट कसं भरायचं? असा प्रश्न फेरीबोट चालक-मालक संघटनेसमोर आहे.

हेही वाचा:

  1. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते 'अटल सेतू'चं उद्घाटन; मुंबई आणखी सुपरफास्ट
  2. सक्रिय राजकारणात सहभागी व्हा, घराणेशाही संपवा-पंतप्रधान मोदींचं युवकांना आवाहन
  3. ठाकरे गटाच्या आमदारांनाही गोगावलेंचाच व्हिप लागणार; विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांचं स्पष्टीकरण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.