ETV Bharat / state

गद्दारांच्या छातीवर पाय रोवणारे बाळासाहेब ठाकरे, शिवसेनाप्रमुखांच्या आठवणींना उजाळा देत सामनामधून शिंदे गटावर निशाणा

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 17, 2023, 7:38 AM IST

Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख दिवगंत बाळासाहेब ठाकरे यांचा आज (17 नोव्हेंबर) 11 वा स्मृतिदिन आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून त्यांना अभिवादन केलंय. याचवेळी शिंदे गट आणि भाजपावर घणाघाती टीका करण्यात आली आहे.

Balasaheb Thackeray Death Anniversary
बाळासाहेब ठाकरे स्मृतिदिन

मुंबई Balasaheb Thackeray Death Anniversary : देशातील आजचे वातावरण निराश करणारे असून असंच सुरू राहिलं तर एक दिवस देशात अराजक माजेल, असा इशारा बाळासाहेब ठाकरे देऊन गेले. तो इशारा खरा ठरताना दिसत आहे. देशात अराजकाचा स्फोट होईल, पण लोकांना आधार देणारे बाळासाहेब नाहीत, अशी खंत ठाकरे गटाचे मुखपत्र सामनामधून व्यक्त करण्यात आलीय.

सामनामधून म्हटले की, एकेकाळी बाळासाहेब तळमळीनं म्हणाले होते की, ज्यांना देशाचे संविधान अन् कायदे मान्य नसतील त्यांनी सरळ कराची-लाहोर गाठावं! बाळासाहेबांचा हा इशारा तेव्हाच्या धर्मांधांसाठी होता. आज आपलेच लोक संविधान व देशाचे कायदे मानायला तयार नाहीत. या घटनाद्रोह्यांना सुतासारखे सरळ करायला बाळासाहेब, तुम्ही आज हवे होता. बाळासाहेब, तुम्ही आज नाहीत, पण तुम्हीच घडवलेली गरम रक्ताची पिढी शिवसेना (ठाकरे गट) महाराष्ट्राची कवचकुंडले बनून लढते आहे, ती लढत राहील. हीच तुम्हाला मानवंदना, असं ठाकरे गटानं म्हंटलंय.

महाराष्ट्राच्या स्वाभिमानास चूड लावणारे दळभद्री राजकारण सुरू : सामनाच्या अग्रलेखात म्हंटलंय की, महाराष्ट्राचं राजकारण हे 'भयंकर' या शब्दाला साजेसं झालंय, अन् शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अशा घोर काळात आपल्यात नाहीत. देशात लोकशाही, संसद, न्यायालये, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा आवळला जातोय आणि अन्यायाविरुद्ध एल्गार पुकारणारे बाळासाहेब ठाकरे आपल्यात नाहीत. महाराष्ट्रात 'जात विरुद्ध जात' असा आरक्षणाचा भडका उडाला आहे. त्या भडक्यात मराठी माणसांचे ऐक्य होरपळताना दिसतंय, अशा वेळी जातीभेद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा, असं सांगणारे बाळासाहेब आपल्यात नाहीत. मुंबईचे लचके तोडले जाताय. महाराष्ट्राच्या राजधानीचें महत्त्व कमी केले जातंय. महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरात लॉबी पळवतंय, महाराष्ट्राच्या स्वाभिमानास चूड लावणारे दळभद्री राजकारण सुरू असताना 'मुंबईस हात लावाल तर मी त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी गर्जना करून महाराष्ट्रद्वेष्टय़ांना 'दे माय धरणी ठाय' करून सोडणारे बाळासाहेब आज नाहीत.

प्रियांका गांधींच्या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांवर साधला निशाना : पुढं प्रियांका गांधींनी केलेल्या क्तव्यावरून सत्ताधाऱ्यांवर टीका करत लेखात म्हंटलंय की, जगभरातल्या एकजात सगळ्या डरपोक व गद्दार लोकांना नरेंद्र मोदी यांनी भाजपात घेतले, असं एक परखड विधान प्रियांका गांधी यांनी केलं. आज बाळासाहेब असते तर सर्व राजकीय मतभेद विसरून ते म्हणाले असते, शाब्बास पोरी! बाळासाहेब परखड आणि स्पष्टवक्ते होते. गुळगुळीत बोलणारे आणि बुळबुळीत विचार करणारे नव्हते. महाराष्ट्रात आज जे बेइमानांचे राज्य सत्तेवर आहे, त्या बेइमान राज्यकर्त्यांच्या 'खुर्च्या' त्यांनी रोज भिजवल्या असत्या. भारतीय जनता पक्षानं सुरू केलेलं महाराष्ट्रद्रोही राजकारण त्यांनी एका फटकाऱ्यात गदागदा हलवून सोडले असतं. शरद पवार यांच्या हयातीत बेइमान गटानं राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा सांगितला. इलेक्शन कमिशनच बेइमान बनलं. त्याच इलेक्शन कमिशननं चाळीस आमदार बेइमान झाले या भांडवलावर बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे उदक शिंदे-मिंधेंच्या हातावर सोडले. अर्थात, आज ही बेइमान मंडळी आणि त्यांना ताकद देणारी दिल्लीतील तथाकथित 'महाशक्ती' त्या आनंदात असली तरी उद्या निवडणुका झाल्यानंतर बाळासाहेबांची खरी शिवसेना कशी घट्ट पाय रोवून उभी आहे, हे या बेइमानांच्या लक्षात येईल.

बाळासाहेब फक्त शरीरानं आपल्यात नाहीत : दरम्यान, मुंबई अदानी यांना विकली जात असताना त्या सौद्यात भाजपासह सगळे सामील होत आहेत. त्यांचा सौदा उधळण्यासाठी मुंबई रक्षक बाळासाहेब आपल्यात नाहीत. बाळासाहेब आज नाहीत ही वेदना आह., पण त्यांनी दिलेला लढण्याचा विचार म्हणजेच धगधगती प्रेरणा आहे. बाळासाहेब फक्त शरीरानं आपल्यात नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेल्या भव्य-विशाल शिवसेनेच्या रूपानं ते महाराष्ट्राच्या कणात आणि मनामनात आहेत. शरीरानं महाराष्ट्राच्या मातीत विसावलेल्या बाळासाहेबांनाच पळविण्याचा प्रयत्न झाला तरीही गद्दारांच्या छातीवर पाय रोवून बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या रक्षणासाठी उभेच आहेत, असंही ठाकरे गटानं म्हंटलं आहे.

हेही वाचा -

  1. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाकरे-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले
  2. Sanjay Raut on Dasara Melava : शिंदेंच्या वडिलांनी शिवसेनेची स्थापना केली होती का? दसरा मेळाव्यावरुन राऊतांचा हल्लाबोल
  3. Political Analysis : उद्धव ठाकरेंच्या समाजवादी पक्षांबरोबरील सोशल इंजिनिअरिंगनं भाजपाचा जळफळाट, जाणून घ्या, राजकीय गणितं
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.