ETV Bharat / state

लातुरात केंद्र सरकारच्या निर्यातबंदीच्या निर्णयाची होळी अन् कांद्याची रांगोळी

author img

By

Published : Sep 23, 2020, 5:07 PM IST

कांदा निर्यातबंदीच्याविरोधात केंद्र सरकारचा निषेध करत लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
आंदोलक
आंदोलक

लातूर - कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा निषेध सर्वत्र होत आहे. लातूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी संघटनेच्यावतीने निर्यातबंदी निर्णयाच्या आदेशाची होळी करण्यात आली तर कांद्याची रांगोळी काढून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आंदोलन करण्यात आले.

कांद्यावर निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांद्यांचे दर घसरले असून शेतकऱ्यांच्या अर्थकारणावर याचा परिणाम होऊ लागला आहे. आसमानी संकटाबरोबरच शेतकऱ्यांना आता सुलतानी संकटाला देखील सामोरे जावे लागत आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळे 25 टक्के पेक्षा अधिकच्या क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पंचनामे करण्याची औपचारिकता न बाळगता थेट हेक्टरी 50 हजारांची मदत करावी शिवाय खरिपातील सर्वच पिकांना 100 टक्के विमा मंजूर करण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

केंद्र सरकार हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाही तर अडचणीचे निर्णय घेत आहे. केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ लागले आहे. या निर्णयाला स्थगिती द्यावी यासाठी या निर्णयाची होळी करण्यात आली तर कांद्याची रांगोळी काढून सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी शेतकरी संघटनेचे रुपेश शंके व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा - ...यामुळे औसा येथील भारतीय स्टेट बँकेतील व्यवहार राहिले ठप्प

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.