ETV Bharat / state

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद फसला - चंद्रकांत पाटील

author img

By

Published : Oct 11, 2021, 3:18 PM IST

Updated : Oct 11, 2021, 4:06 PM IST

महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद फसला आहे. जे काही सध्या बंद आहे ते केवळ दादागिरीमुळे बंद असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी गरज पडल्यास कर्ज काढू, असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवीनच लॉलीपॉप दाखवला आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंद फसला आहे. जे काही सध्या बंद आहे ते केवळ दादागिरीमुळे बंद असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, लखमीपूर येथे घडलेली घटना अतिशय अमानवीय आहे. मात्र, विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला आहे. आता आरोपीला पकडले आहे, तरीही महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला, असेही चंद्रकांत पाटील यावेळी म्हटले.

बोलताना चंद्रकांत पाटील

खुर्ची टिकवायची असेल तर मागे जाणे भाग पडते

आजचा बंद महाविकास आघाडी सरकारमधील नेमक्या कोणत्या पक्षाच्या आग्रहावरून झाला असावा असे विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, शरद पवार यांनी पहिल्यांदा बंदची घोषणा केली. त्यानंतर बाकीच्यांना त्यांच्या मागून फरफटत जावे लागले. त्यामुळे खुर्ची टिकवायची असेल तर मागे जाणे भागच पडते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेवरला लगावला. दरम्यान, या बंदचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे. एकीकडे कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना त्यांनी हा बंद पुकारला, असेही ते म्हणाले.

अजित पवारांनी जनतेला दाखवला नवीन लॉलीपॉप

दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी गरज पडल्यास कर्ज काढू, असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला नवीनच लॉलीपॉप दाखवला आहे, अशी टीका पाटील यांनी केली. हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातील आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत यांना जनताच जागा दाखवेल, असेही पाटील म्हणाले.

तर तीस रुपयांनी पेट्रोल डिझेलचे दर स्वस्त होतील

वाढत्या महागाईबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करायचे असल्यास हे दोन्ही घटक जीएसटीच्या कक्षेत आणणे गरजेचे आहे. मात्र, याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच विरोध केला. कारण जीएसटीमुळे त्यांना मलिदा खायला मिळणार नाही. जर हे दोन्ही घटक जीएसटीच्या कक्षेत आले तर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती थेट तीस रुपयांनी कमी होऊन सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल, असेही यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. दरम्यान, भाजपचे सरकार असणाऱ्या राज्यात काय परिस्थिती आहे, याबाबत विचारले असता त्यांनी टोलवाटोलवी करत विषय बाजूला केला.

हेही वाचा - 'महाराष्ट्र बंद'वर काय म्हणाले संजय राऊत?

Last Updated : Oct 11, 2021, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.