कोल्हापूर - शहरातील पहिल्या मानाच्या गणपतीचे यंदा साधेपणाने विसर्जन पार पडले. तुकाराम माळी गणेश मंडळाची कोल्हापुरात पहिला मनाचा गणपती म्हणून ओळख आहे. कोल्हापूरच्या प्रथम नागरिक महापौर निलोफर आजरेकर आणि आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये गणपतीचे विसर्जन पार पडले.
कोरोनामुळे यावर्षी गणेशोत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच गणेश मंडळांना आपापल्या मंडळाच्या बाहेरच विसर्जन कुंड तयार करून त्यामध्ये मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन प्रशासनाने केले होते. त्याला सर्वच मंडळांनी प्रतिसाद दिला आहे. मंडळांनी अत्यंत साधेपणाने विसर्जन सुरू केले आहे.
दरवर्षी मोठ्या उत्साहात कोल्हापुरात गणेश विसर्जन मिरवणूक पार पडत असते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुरू होणारी विसर्जन मिरवणूक 30 ते 35 तास चालते. यंदा मात्र हे चित्र पहायला मिळत नाही. यावेळी साधेपणाने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंगच्या सर्वच नियमांचे पालन करत गणेश विसर्जन पार पडत आहे.