जालना - जिल्ह्यातील मंठा सहकारी बँकेतील ( Mantha Urban Cooperative Bank ) सभासदांना प्रातिनिधिक स्वरूपात विम्याच्या रकमेच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. हे वितरण दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते तर जालना येथील हॉटेल गॅलक्सी येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Union Minister Raosaheb Danve ) यांच्या हस्ते करण्यात आले.
18 ठिकाणी वितरण -
सर्वसामान्य व्यक्ती आपल्या भविष्यासाठी काबाडकष्ट करून आपली पुंजी बँकांमध्ये ठेवतो. मात्र, बँक अडचणीत आल्यास ठेवीदारांना त्यांची पुंजी परत मिळणार नाही या विचाराने तो हतबल होतो. अशा ठेवीदारांनी सहकारी बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींवर डीआयजीसीजी (डिपॉझिट इन्शुरन्स अॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन) यांच्यामार्फत विमा काढण्यात येतो. यापूर्वी केवळ 50 हजार व एक लक्ष रुपयांचा विमा काढण्यात येत होता. मात्र, यामध्ये सप्टेंबर 2021मध्ये सुधारणा करत विमा रकमेची रक्कम पाच लक्ष रुपयांपर्यंत करण्यात आली आहे. संपूर्ण देशभरात 18 ठिकाणी आजच्या दिवशी ठेवीदारांना विमा रकमेचे वितरण करण्यात येत असल्याची माहितीही मंत्री दानवे यांनी दिली.
हेही वाचा - Jalna MNS leader arrest : जाफ्राबाद डेपोची बस अडवून फेऱ्या बंद, मनसे पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
एखादी बँक अडचणीत आल्यास ठेवीदारांना हमी देण्याची घटना 35 वर्षांमध्ये पहिल्यांदाच पाहत असल्याचे सांगत जालना जिल्ह्यात यापूर्वी बँका अडचणीत आल्या आहेत. मंठा सहकारी बँकेतील 28 हजार 536 खातेदारांना विम्याची रक्कम मंजूर झाली आहे. 27 हजार 534 खातेदाराच्या खात्यात सुमारे 37 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती दानवे यांनी दिली.