जळगाव - महाराष्ट्रात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीला 170 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यातून 50 आमदार फोडणे शक्य नाही. त्यामुळे भाजपने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणण्याचे स्वप्न पाहू नये. आमदार म्हणजे काय बैलजोडी नाही, कुणीही येईल आणि पळवून नेईल, अशा शब्दांत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा शिवसेना उपनेते गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
गुलाबराव पाटील शुक्रवारी जळगावात होते. यावेळी अजिंठा विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. मध्यप्रदेशनंतर आता राजस्थानमध्ये भाजपकडून काँग्रेस सरकार पाडण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राजस्थाननंतर महाराष्ट्रात देखील असा प्रयोग भाजपकडून होईल का? या प्रश्नावर उत्तर देताना गुलाबराव पाटील यांनी भाजपला आपल्या खास शैलीत हा इशारा दिला.
पुढे बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचे संख्याबळ कमी असल्याने त्याठिकाणी सरकार पाडण्यात भाजपला यश आले. मात्र, राजस्थानमध्ये मध्यप्रदेशपेक्षा उलट परिस्थिती असल्याने त्यांना जोरदार धक्का बसला आहे. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे स्वप्न तर भाजपने सोडूनच द्यावे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारकडे 170 आमदारांचा पाठींबा आहे. आमदार काय बैलजोडी आहे का? कोणीही पळवून नेईल? असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी यावेळी लगावला.
देव करो फडणवीसांना कोरोना होवू नये-
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे काही दिवसांपूर्वी जळगाव दौऱ्यावर आले होते. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत चिमटा काढताना, माजीमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 'मला कोरोना झाल्यास शासकीय रुग्णालयातच दाखल करा', असे सांगितले होते. या मुद्यावर पत्रकारांनी विचारणा केली असता, गुलाबराव पाटील प्रतिक्रिया देताना म्हणाले की, देव करो फडणवीसांना कोरोना होवू नये. देवेंद्र फडणवीस यांचा शासकीय रुग्णालयातील उपचार पद्धतीवर विश्वास आहे. महाविकास आघाडी सरकारकडून योग्य त्या उपाययोजना होत असल्याने त्यांनी सरकारला समर्थन दिले आहे, असा चिमटा त्यांनी काढला.
पोलीस प्रशिक्षण केंद्र वरणगावातच-
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे प्रस्तावित असलेले पोलीस प्रशिक्षण केंद्र तेथेच होईल, असा विश्वास देखील गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला. येत्या बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. तेव्हा या केंद्राचे आदेश मी स्वत: घेवून येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.