हिंगोली - जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आसोलावाडी परिसरात पती-पत्नी बैलगाडीने शेतात जाताना ओढ्यात वाहून गेल्याची घटना घडली होती. काल अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मात्र, आज पहाटेपासून शोध घेतला असता सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास पत्नीचा मृतदेह सापडला असून पतीचा शोध सुरू आहे.
![hingoli latest news wife husband carry away hingoli हिंगोली लेटेस्ट न्यूज कळमनुरी हिंगोली न्यूज हिंगोली पाऊस बातमी hingoli rain news](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-hin-01-drwon-woman-vis-7203736_20062020103118_2006f_1592629278_11.png)
जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. अशातच कुंडलिक गोविंदा असोले आणि त्यांची पत्नी धुरपताबाई हे दोघेही शेतात जात होते. मात्र, बुडकी ओढ्यात अचानक पाण्याची पातळी वाढली आणि दोघेही ओढ्यात वाहून गेले. काल रात्रीपर्यंत दोघांचा पाण्यात शोध घेतला होता. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले. आज पहाटे घटनास्थळी बचाव पथ दाखल होऊन शोधकार्य सुरू केले. त्यावेळी धुरपताबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर कुंडलिक यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे ओढ्याचे पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.