ETV Bharat / state

शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरुच... पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगून पतीने केली आत्महत्या

author img

By

Published : May 23, 2020, 1:37 PM IST

madhukar chavan
मधुकर चव्हाण

वसमत तालुक्यातील वाघी गावामधील शेतकरी मधुकर चव्हाण यांनी पत्नीला स्वयंपाक बनवायला सांगून दोघे ही एकत्र जेवण करु असे सांगितले. पत्नी जेवण बनवत असताना मधुकर चव्हाण यांनी आतील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली.

हिंगोली- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे हतबल झालेले शेतकरी जीवनयात्रा संपवत आहेत. एका घटनेची आठवण जाते न जाते तोच पुन्हा एका कर्जबाजारी शेतकऱ्याने आत्महत्या होत आहे. वसमत तालुक्यातील वसतम येथील मधुकर बबनराव चव्हाण (35) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मधुकर यांना वाघी शिवारात दोन एकर शेती असून, याच शेतावर संसाराचा गाडा चालविला जात होता. मात्र, गेल्या तीन ते चार वर्षांपासून सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतात काहीच उत्पन्न झाले नव्हते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे मधुकर चव्हाण यांच्याजवळ असलेले पैसे संपले. मजुरीची कामे देखील कामे मिळत नसल्याने चव्हाण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. मागील तीन ते चार दिवसांपासून सतत विचारात मग्न असायचे. चव्हाण यांनी गुरुवारी रात्री साडे-आठच्या सुमारास पत्नीला जेवण बनवायला सांगितले आणि आतल्या खोलीत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. स्वयंपाक तयार झल्यांनातर पत्नी जेव्हा बोलवायला गेली तर समोरील दृश्य पाहून पत्नी भोवळ येऊन जागीच कोसळली.

घटनेची माहिती कळताच कुरुंदा पोलीस ठाण्याचे सपोनि सुनील गोपीनवार, जमादार प्रकाश नेव्हल, तुकाराम आमले, भिसे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधिन करण्यात आला. या प्रकरणी बाबुराव चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कुरुंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.