हिंगोली - तालुक्यातील बोडखी येथे शेतात काम करण्यासाठी गेलेल्या एका नऊ वर्षीय मुलगी व पंचावन्न वर्षीय वृद्धाचा विहीर बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. पाण्यात बुडून मृत्यू होण्याची जिल्ह्यातली ही दुसरी घटना आहे. एका पाठोपाठ दोन घटना घडल्याने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
सोनाली सुभाष धवसे (वय 9), मुकिंदा धवसे (वय 55) अशी मृतांची नावे आहेत. शेतकरी मुकिंदा धवसे यांच्या शेतात खोडक्या वेचणीचे काम सुरू होते, तर सोनालीसह इतर तीन ते चार महिला कामासाठी गेल्या होत्या. सकाळी शेतात गेल्यानंतर सोनाली आणि शेतकरी धवसे हे विहिरीवर पाणी आणण्यासाठी गेले होते. विहिरीवर गेल्यानंतर सोनालीचा पाय घसरल्याने ती विहिरीत पडली, तिला वाचवण्यासाठी शेतकरी मुकिंदा यांनीही विहिरीत उडी घेतली. मात्र, बराच वेळ दोघे पाणी घेऊन परत न आल्याने, शेतीकामासाठी आलेल्या महिलांनी विहिरीकडे धाव घेतली तर दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आले.
महिलांनी आरडाओरडा करत गावांमध्ये धाव घेतली आणि ही घटनाही ग्रामस्थांना सांगितली. ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेऊन दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. अजून तरी या प्रकरणी कोणतीही नोंद झालेली नाही. शेतकरी मुकिंदा यांचा मुलगा अन् सोनालीचे आई-वडील हे नगर येथे कामानिमित्त गेलेले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हे सर्वजण नगर या ठिकाणीच अडकलेले आहेत. सोनालीही तिच्या आजीकडे राहत होती. तर मुकिंदा धवसे हे पती-पत्नी असे दोघेच राहतात.