ETV Bharat / state

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

author img

By

Published : Jan 30, 2021, 8:42 PM IST

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात बरेच काम हे कंत्राटी पद्धतीने चालते. त्याचे कंत्राट अनेक कंपन्यांना दिले जाते. यातूनच अनेक कंपन्या बड्या झाल्या. त्यांनी आपले साम्राज्य येथे पसरवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्यांपासून वंचित ठेवले जाते.

कर्मचारी
कर्मचारी

चंद्रपूर- चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात अनेक कंपन्या कार्यरत आहेत. येथे कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कापासून वंचित ठेवण्यात येते. त्यांनी मागणी केल्यास कंपनीकडून त्यांचा छळ केला जातो. त्यांना कामावरून काढण्याची धमकी देण्यात येते. यावर कारवाई करण्यास वीज केंद्रातील प्रशासन देखील टाळाटाळ करते. याविरोधात शिवसेना प्रणित कंत्राटी कर्मचारी सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. 2 फेब्रुवारीपासून या संघटनेने कामबंद संप पुकारला आहे. यादरम्यान कंत्राटी कर्मचारी कामावर जाणार नाहीत. तर कंपनीच्या गळचेप्या भूमिकेचा निषेध करणार आहेत.

बंडू हजारे

कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्यांपासून ठेवले जाते वंचित-

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात बरेच काम हे कंत्राटी पद्धतीने चालते. त्याचे कंत्राट अनेक कंपन्यांना दिले जाते. यातूनच अनेक कंपन्या बड्या झाल्या. यामध्ये अडुरे, भावना, रुचिकुची, प्रीमियम, कुणाल ओमेगा-डेल्टा, सांद्रोज, श्री ओम, कोटनका, एस. एस. दुबे या कंपन्यांनचा समावेश आहे. त्यांनी आपले साम्राज्य येथे पसरवले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या न्याय मागण्यांपासून वंचित ठेवले जाते. किमान वेतन व इतर भत्ते त्यांना दिले जात नाहीत. कुशल कामगारांना त्यांच्या श्रेणीनुसार मासिक वेतन दिले जात नाही. 20 टक्के पूरक भत्त्याचा एरियस दिला जात नाही. दिवाळीचा बोनस त्यांना मिळत नाही. आठ तास न ठेवता त्यांच्याकडून 12 तास काम करून घेतले जाते. मागणी केल्यास कामगारांना त्रास दिला जातो. त्यांना कामावरून कमी करण्याची धमकी दिली जाते. कामगार संघटनेत सामील झाल्यास त्यांच्यावर दबाव टाकला जातो. त्यामुळे अशा कंपन्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी कंत्राटी कर्मचारी सेनेने सातत्याने पाठपुरावा केला.

2 फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन-

महाऔष्णिक वीज केंद्रातील प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. संबंधित कुठल्याही विभागाने यावर ठोस भूमिका घेतली नाही. त्यामुळे सेनेने याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी सेनेने कामबंद आंदोलन पुकारले आहे. 2 फेब्रुवारीपासून हे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू होणार आहे. यावेळी चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील सर्व प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यात कंत्राटी कामगार सहभागी होणार आहेत. यामुळे महाऔष्णिक वीज केंद्राचे उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावित होण्याची शक्यता आहे.

अशावेळी अतिरिक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना बाहेरून आणल्यास त्यांना आता प्रवेश केला जाऊ दिला जाणार नाही, असा इशारा कंत्राटी कर्मचारी संघटनेन दिला आहे. हे आंदोलन जिल्हाध्यक्ष बंडू हजारे, जिल्हा सचिव अमोल मेश्राम, जिल्हा कार्याध्यक्ष कैलास तेलतुंबडे, अध्यक्ष प्रफुल सागोरे, उपाध्यक्ष संतोष ढोक, सचिव प्रमोद कोलरकर यांच्या नेतृत्वात होणार आहे.

हेही वाचा- विकासकामांसाठी 'मामा’ची मदत घ्या, नाहीतर माझाच मामा करू नका, अजित पवारांची मिश्किल टिप्पणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.