ETV Bharat / state

माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी; पूजाच्या वडीलांचे आवाहन

author img

By

Published : Feb 15, 2021, 7:34 PM IST

Updated : Feb 15, 2021, 10:44 PM IST

अद्यापही पूजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांपुढे आपले मन मोकळे केले.

पुजाचे वडिल
पुजाचे वडिल

परळी (बीड) - येथील बंजारा समाजाची युवती पूजा चव्हाण हिने पुण्यात आत्महत्या केली. यानंतर सोशल मिडीयावर उलटसुलट चर्चा सुरू झाली. दरम्यान, पूजाच्या मृत्यूनंतर तिच्या आई, वडीलांनी प्रतिक्रिया दिली आहे. "माझा कोणावरही संशय नाही. सोशल मीडियावरील आमची बदनामी थांबवावी," असे पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटले आहे.

पुजाचे वडिल

पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता-

अद्यापही पूजाच्या मृत्यूची आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. यासंदर्भात पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांजवळ मन मोकळे करताना सांगितले, की पूजा माझी मुलगी नव्हती तर तो मुलगा होता. ती अत्यंत धाडसी होती. पूजाच्या नावावर पोल्ट्रीफार्म सुरू करण्यासाठी बँकेकडून कर्ज काढले आहे. पण गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय पूर्ण तोट्यात आहे. याचा ताण पूजाला येत होता. तसेच पूजा सतत आजारी असायची याचाही ताण तिला येत होता. मी तिला तू ताण घेऊ नको सर्व काही व्यवस्थित होईल, असे सांगत होतो.

माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी-

पण पुण्यात जाऊन तिने बहुतेक याच कारणामुळे आत्महत्या केली आहे, असे वाटते. दुसरे कोणतेही कारण नाही. फक्त माध्यमांनी आमची बदनामी थांबवावी, असे आवाहन लहू चव्हाण यांनी केले आहे. चौकशी मधून काय पुढे यायचे ते येईल. आमचा न्याय देवतेवर पूर्ण विश्वास आहे. आमचा समाज आमच्यापाठीशी आहे, असे लहू चव्हाण यांनी सांगितले.

मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी-

तर पूजाचे आजोबा यांनी बोलताना सांगितले की, पूजा २०-२५ दिवसांपूर्वी येवून भेटून गेली. तिच्या मृत्यूची चौकशी शासकीय यंत्रणेमार्फत करावी, अशी मागणी केली आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण: विरोधक सत्ताधारी आमने-सामने

दरम्यान, या आत्महत्या प्रकरणासंदर्भात नवीन माहिती समोर येत आहे. या प्रकरणाशी संजय राठोड यांटा थेट संबंध असल्याचा उल्लेख भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यामुळे धनंजय मुंडे प्रकरणानंतर संजय राठोड यांच्यामुळे महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. बंजारा समाजाचे नेते आणि माजी आमदार हरिभाऊ राठोड म्हणाले, याबाबत काय बोलायचं आपलेच दात आणि आपलेच ओठ आहेत. या सगळ्या प्रकरणाची चौकशी पुणे पोलिसांकडून सुरू आहे आणि या प्रकरणावर मुख्यमंत्र्यांनी भाष्य केल आहे. त्यामुळे मी यावर अधिक भाष्य करणार नाही. माझा संजय राठोड यांच्याशी संपर्क झालेला नाही. जर माझा संपर्क झाला तर मी त्यांना या प्रकरणासंदर्भात विचारणा करेल, अशी माहिती त्यांनी सांगितली.

अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करा, परळी पोलिसात तक्रार दाखल-

पूजा चव्हाण प्रकरणांमध्ये विरोधी पक्षाकडून भूमिका मांडत असलेले अतुल भातखळकर यांच्याविरोधात बंजारा समाजाच्या वतीने तक्रार करण्यात आली आहे. बंजारा समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी तसेच अश्लील व जातिवाचक शब्दाचा वापर करत माध्यमांवर बदनामीकारक माहिती दिल्यामुळे भाजप नेते अतुल भातखळकर यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बंजारा समाजाच्या वतीने परळी या ठिकाणी करण्यात आली. परळी पोलीस स्टेशनमध्ये बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी अतुल भातखळकर यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे.

वाशिममध्ये बंजारा समाजाच्या महंतांची बैठक-

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच गाजत असून विरोधक आक्रमक झाले आहेत. मात्र, या संदर्भात बंजारा समाजाचे धर्मगुरू रामराव महाराज यांचे धर्मपिठाधिश्वर बाबूसिंग महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत पोहरादेवी येथे बैठक झाली. यावेळी सर्वच महंतांनी संजय राठोड यांच्यावर जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाही, तोपर्यंत या प्रकरणाशी जोडणे योग्य नाही, त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा इथेच थांबवावी, अशी विनंती केली आहे.

पूजा चव्हाण यांनी केलेली आत्महत्या ही दुर्दैवी आहे. पूजाला न्याय मिळाला पाहिजे. मात्र, ऑडिओ क्लिपवर समाजाचे नेते संजय राठोड यांना बदनाम केल्या जात आहे. त्यामुळे या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर सत्य समोर येईल. देशातील संपूर्ण समाज त्यांच्या पाठीशी असल्याचे येथील महंतांनी सांगितले.

विरोधकांच्या बोलण्यात तथ्य नाही, चौकशीतून सत्य पुढे येईल - गृहमंत्री

पूजा चव्हाण आत्महत्येमागील सत्य काय आहे ते पोलीस लवकर समोर आणतील. पोलिसांवर कोणाचाही दबाव नाही. तसेच विरोधी पक्षाच्या आरोपात काहीही तथ्य नसल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. ते नागपुरात बोलत होते. पूजा चव्हाण प्रकरणात नियमानुसार रितसर चौकशी होणार आहे. चौकशीतून जे काही समोर येईल त्यानुसार राज्य सरकार पुढे निर्णय घेईल, असेही गृहमंत्री यांनी सांगितले.

नियमानुसार चौकशी होणार असल्याचे याआधीच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. पुणे पोलीस नियमानुसार चांगले काम करत चौकशी करत आहे. चौकशी पूर्ण झाल्यावर जे काही सत्य आहे ते बाहेर येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते.

पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे- देवेंद्र फडणवीस

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी ज्याप्रकारे कारवाई करायला पाहिजे, ती होताना दिसत नाही, त्यामुळे पोलीस कुठल्या दबावात आहे का, असा प्रश्न निर्माण होतो, अशी प्रतिक्रिया विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी सुमोटो कारवाई करायला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

काय आहे प्रकरण -

पुण्यातील हडपसर येथील एका सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरून पूजा चव्हाण या 22 वर्षीय तरुणीने उडी घेत आत्महत्या केली. याबाबतची तक्रार वानवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली आहे. त्यानंतर तिच्या आत्महत्या प्रकरणाशी कथितरित्या निगडीत असलेल्या काही ऑडिओ क्लिपही व्हायरल झाल्या आहेत. भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी संपूर्ण घडामोडी आणि समोर येणाऱ्या माहितीच्या आधारावर शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना जबाबदार धरत कारवाईची मागणी केली. पूजा चव्हाण ही मुळची बीड जिल्ह्यातील परळीची रहिवासी आहे. ती पुण्यात स्पोकन इंग्लिशच्या क्लाससाठी गेली होती, अशी माहिती समोर येत आहे.

हेही वाचा- पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण, कर्ज फेडीसाठी बॅंकेने कधीच नोटीस पाठवली नाही

Last Updated : Feb 15, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.