बीड - अनेक वर्षापासुन राज्यातील निवासी डॉक्टरांच्या ( Resident Doctors Strike ) समस्येवर मार्ड संघटना शासन दरबारी लढत असली तरी या संघटनेला अद्यापही यश आले नाही. दरवर्षी संप पुकारूनही डॉक्टरांच्या मागण्याकडे शासन अक्षम्य दुर्लक्ष ( Ignoring doctor request ) करीत आहे. त्यांच्या इशारानंतर अद्यापही शासनाने त्यांच्यासोबत बोलणी केलेली नाही. त्यामुळे आजपासून राज्यातील हजारो निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. राज्यातील सर्व शासकीय, पालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आज संप पुकारला आहे.
रुग्णसेवेवर मोठा परिणाम - शासनाने निवासी डॉक्टरांच्या मागण्यांवर सकारत्मक विचार न केल्यास राज्यातील सर्वच वैद्यकीय रूग्णालयातील रूग्णसेवेवर मोठा परिणाम होणार असून रूग्णांना जीव गमवावा लागेल अशी परिस्थिती संघटनेच्या संपामुळे निर्माण होण्याची शक्यता आहे. अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील 155 निवासी डॉक्टर्स आजपासून संपावर गेले आहेत.
अत्यवस्थ रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळणार - दरम्यान, संपकाळात अपघात विभाग, अतिदक्षता विभाग, बाल अतिदक्षता विभाग यासारख्या आपत्कालीन सेवा सुरु राहणार आहेत. अत्यवस्थ रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यात कुठलीही अडचण होणार नसल्याचे मार्ड संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, आता हा संप किती दिवस चालणार, या निवासी डॉक्टरांची मागण्या पूर्ण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे.