ETV Bharat / state

मराठा आरक्षण : 5 जूनला मोर्चा निघणार - विनायक मेटे

author img

By

Published : Jun 2, 2021, 8:08 AM IST

Updated : Jun 2, 2021, 8:44 AM IST

vinayak mete
विनायक मेटे

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे. हा आक्रोश 5 जूनला बीड येथील मोर्चातून दिसून येईल. शासनावर विविध माध्यमातून दबाव आणल्यानंतर ईडब्ल्यूएस कोट्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

परळी (बीड) - सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केल्यानंतर आता पुन्हा एकदा आरक्षणासाठी लढायचे असा ठाम निर्धार मराठा समाजाने केला आहे. येत्या 5 जूनला सर्व नियमांचे पालन करून बीड येथील आंदोलन कुठल्याही परिस्थितीत संपन्न होईल, असे शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार विनायकराव मेटे यांनी स्पष्ट केले. बीड येथे मराठा आरक्षणाबरोबर समाजाच्या अनेक मागण्यांसाठी भव्य मोर्चा आयोजित केला असल्याची माहिती त्यांनी दिली. परळी वैजनाथ येथील चेंबरी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित नियोजन बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे याबाबत बोलताना

काय म्हणाले विनायक मेटे?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवले आहे. त्यानंतर मराठा समाजामध्ये प्रचंड अस्वस्थता आणि असंतोष निर्माण झाला आहे. हा आक्रोश 5 जूनला बीड येथील मोर्चातून दिसून येईल. शासनावर विविध माध्यमातून दबाव आणल्यानंतर ईडब्ल्यूएस कोट्याच्या माध्यमातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, शासनाला लाथा घातल्याशिवाय कुठलाही निर्णय केला जात नाही. आरक्षणाबरोबरच मराठा समाजाच्या अनेक मागण्या आहेत. त्या मागण्या शासन दरबारी मांडण्यासाठी व त्यांना मंजूर करून घेण्यासाठी बीड येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या उभारणीसाठी जिल्हाभरात ठिकठिकाणी आम्ही बैठका घेतल्या. या बैठकांच्या माध्यमातून लोकांना सहभागी होण्याचे आम्ही आवाहन करत आहोत, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - मराठा आरक्षणासाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

येत्या 5 जूनला होणारे आंदोलन ही कळ्या दगडावरची रेघ आहे. सर्व नियमांचे पालन करून बीड येथील आंदोलन कुठल्याही परिस्थितीत संपन्न होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंतचे मोर्चे मुक्त स्वरूपाचे होते. मात्र, या मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या समस्यांवर आवाज उठवला जाणार आहे, असेही मेटे म्हणाले. आज झालेल्या बैठकीत अभिजित देशमुख, श्रीनिवास देशमुख, माणिकराव नाईकवाडे, देवराव कदम, यशवंत सोनवणे, कैलास नाईकवाडे, ओम काळे, केशव साबळे, राजू सय्यद, संदीप दिवटे, सुधाकर नाईकवाडे, बालासाहेब पथरकर, भागवत साबळे, अरुण सपाटे, राहुल नाईकवाडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Last Updated :Jun 2, 2021, 8:44 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.