ETV Bharat / state

Majalgaon Encroachment Issue: 4 दिवसात 1200 अतिक्रमणे काढली, 40 लाखांची वसुली; माजलगाव नगरपालिकेची कारवाई

author img

By

Published : May 7, 2023, 4:48 PM IST

बीडच्या माजलगावमध्ये अवैध अतिक्रमणावर नगरपालिकेने हातोडा मारणे सुरू केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून माजलगाव शहरातील अतिक्रमण केलेली दुकाने हटविली जात आहेत. नगरपालिकेने 4 दिवसात जवळपास 1200 अतिक्रमणे काढत 40 लाखांची वसुली केल्याची माहिती नगरपालिकेचे परिविक्षाधीन 'आयएएस' मुख्याधिकारी आदित्य जीवने यांनी दिली.

Majalgaon Encroachment Issue
अतिक्रमण कारवाई

अतिक्रमणावर बुलडोझर चालविताना माजलगाव नगरपालिका प्रशासनाचे कर्मचारी

बीड: माजलगाव शहरात काल (शनिवारी) पुन्हा एकदा अतिक्रमण करून बांधलेल्या, अलिशान दुकानांवर नगरपालिकेचे परिविक्षाधीन 'आयएएस' मुख्याधिकारी आदित्य जीवने यांनी बुलडोजर फिरवला आहे. त्यापैकी पूर्णपणे अतिक्रमणात असणारी तब्बल 70 दुकाने खरडून काढण्यात आली. तर रखडलेला तब्बल 40 लाखांचा कर अवघ्या तीन दिवसात वसूल करण्यात आला. 100 अवैध नळ कनेक्शन कट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये राजकीय नेते आणि पुढार्‍यांची असणारी अतिक्रमणे देखील काढण्यात आली आहेत. तर 'एमपीएससी' आणि 'यूपीएससी'ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, 4000 स्क्वेअर फुटमध्ये हॉल बांधून, त्या ठिकाणी 'एसी अभ्यासिका' नगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. याबाबत आदित्य जीवने यांनी माहिती दिली.


नागरिकांमध्ये समाधान: माजलगाव नगरपालिकेला गेल्या अनेक वर्षांपासून अनेक वेळा निवेदने, तक्रारी करून देखील राजकीय वरदहस्तामुळे अतिक्रमणे काढली जात नव्हती; मात्र आदित्य जीवने यांनी अतिक्रमणावर बुलडोझर फिरवल्याने, नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. अतिक्रमण हटविल्यामुळे शहराने मोकळा श्वास घेतला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली.

माजलगावात सर्वाधिक अतिक्रमणांचा सफाया: बीड जिल्ह्यात या अगोदरही अनेक भागातील अतिक्रमण काढण्यात प्रशासनाला यश आले होते. बीडचे जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमणांवर बुलडोजर चालवला होता. त्यानंतर मात्र बीड शहरात अतिक्रमणाचे प्रमाण वाढत गेले. त्याचबरोबर बीड शहरातच नव्हे तर बीड जिल्ह्यात अनेक शहरांमध्ये अतिक्रमण दिसून येत होते. त्यामुळे वाहतुकीची कोंडीचे प्रमाण वाढत होते. यामुळे दुचाकीस्वार व चारचाकी वाहन चालकाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. बीड जिल्ह्यातील अनेक नगरपंचायतीने अतिक्रमण काढावेत अशी मागणीसुद्धा अनेक वेळा सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. अनेक वेळा आंदोलने करून देखील अतिक्रमण काढली जात नसल्याचे चित्र देखील बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यातील कमी कालावधीत सर्वांत जास्त अतिक्रमण काढणारी माजलगाव नगरपंचायत ठरली आहे.

कारवाईच्या विरोधात दुकानदाराने जाळले साहित्य: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील वाळूज औद्योगिक परिसरातील जय मल्हार चौकात असलेली अतिक्रमणे काढण्याचे काम सिडको प्रशासनने सुरू केले आहे. यामुळे संतापलेल्या एका दुकानदाराने अतिक्रमण पथकासमोरच आपल्या दुकानातील सामान जाळून टाकले. या घटनेमुळे आसपासच्या परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बापाची जमीन विकून दुकान टाकली. अशा व्याकुळतेने दुकानदार अतिक्रमण पथकाला सांगत होता. अतिक्रमण हटाव पथकाला विरोध करत महिलेने अंगावर रॉकेल ओतून घेतल्याची घटना छत्रपती संभाजी नगर येथील मयूरबन कॉलनीत 29 जानेवारी, 2020 रोजी घडली होती. पोलिसांनी महिलेला ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले. यावेळी महिलांनी शिवीगाळ केली. मयूरबन कॉलनीमधील महापालिका शाळेशेजारील मोकळ्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले होते. याआधी काही दिवसांपूर्वी अतिक्रमण हटाव पथकाने संपूर्ण अतिक्रमण हटवले होते. मात्र, पथक गेल्यानंतर पुन्हा अतिक्रमण झाल्याची माहिती समोर आली.

हेही वाचा: Sushma Andhare : उपमुख्यमंत्र्यांबाबत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; 'या' तारखेला बसणार धक्का

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.