औरंगाबाद - सरकारी गायरान जमीन कसणाऱ्या वडगाव कोल्हाटी येथील आदिवासी वस्तीवर असलेले अतिक्रमण सिडकोने पोलिसांच्या मदतीने सोमवारी हटविले होते. दरम्यान, महिलांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. यावेळी एका महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते. याविषयी नागरिकांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत संबंधित पोलीस अधिकारी व सिडको अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
हेही वाचा - अंधश्रद्धेतून काकाची हत्या; पोलिसांकडून पुतण्यासह पाच जणांना अटक
वडगाव कोल्हाटी भागात येथील गट क्रमांक 4 व गट क्रमांक 14 या सरकारी गायरान जमिनीवर 1970 पासून आदिवासी समाज जमीन कसून शेती करीत आहेत. या जागेचे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे. सध्या औरंगाबाद खंडपीठामध्ये हा खटला चालू आहे, असे पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याच जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी सिडको प्रशासनाचे अधिकारी व पोलीस बंदोबस्तात गेले होते. कारवाई सुरू असताना भरताबाई जयराम चव्हाण या महिलेने स्वतःला पेटवून घेतले होते.
सध्या चव्हाण या मृत्यूशी झुंज देत आहेत. सिडको प्रशासनाने पोलीस बाळाचा वापर करून महिलांवर अमानुष मारहाण केली आहे. आमच्या शेरीवर (घरावर) जेसीबी चालविण्यात आले, हे सर्व बेकायदेशीर असून संबंधित पोलीस अधिकारी व सिडकोचे अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी अनेक गायरानधारक पोलीस आयुक्तालयासमोर ठिय्या देऊन बसले होते. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
हेही वाचा - धक्कादायक...! अमरावतीत सख्ख्या बहिणीवर बलात्कार