ETV Bharat / state

Maratha Reservation : 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या - मनोज जरांगे पाटील

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 3, 2023, 3:43 PM IST

Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शासनाला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या कालावधीत न्या. शिंदे समिती, मागासवर्ग आयोगानं महाराष्ट्रभरातील कागदपत्रांचा अभ्यास करून कुणबी प्रमाणपत्रांचं वितरण सुरू करावं, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केलंय.

Maratha Reservation
Maratha Reservation

मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया

छत्रपती संभाजीनगर Maratha Reservation : मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याबाबत ठाम असल्याचं मत व्यक्त केलं आहे. सरकारच्या शिष्टमंडळानं गुरुवारी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर जरांगे यांनी 24 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत वाढवून देत, मराठा आंदोलन मागे घेतलंय. त्यानंतर मनोज जरांगे यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यार उपचार सुरू आहेत.

मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोबरपासून अंतरवली सराटीत उपोषण सुरू केलं होतं. पहिल्या टप्प्यात उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: मनोज जरांगे यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी 30 दिवसांची मुदत मागितली होती. मात्र जरांगे यांनी 40 दिवसांचा अवधी देऊन आरक्षण देण्याची मागणी केली होती. सरकारला दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी आंदोलनाच्या दुसरा टप्प्याला सुरवात केली. सुमारे नऊ दिवस उपोषण केल्यानंतर सरकारच्या शिष्टमंडळानं आंदोलनस्थळी जाऊन जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर जरांगे यांनी उपोषण मागं घेण्याची घोषणा केली. मात्र आरक्षणाच्या तारखेवरून सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. त्यावर मनोज जरांगे यांनी देशातील सर्व मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र 24 डिसेंबरपर्यंत देण्यात यावं अशी अट असल्याचं म्हटलंय.

ॲड सदावर्ते यांची कोर्टात धाव : मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या विरोधात ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाचं आंदोलन शांततेत होतं. कोणी काही म्हटलं, तरी त्यावर आम्हाला काही बोलायचं नाही. त्यांना काय करायचं करू द्या, उपोषण स्थगित केल्यानं सगळीकडं शांतता आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी नाव न घेता गुणरत्न सदावर्ते यांच्यावर केलीय.

ही तर स्टंटबाजी : मराठा आरक्षणावेळी झालेल्या जाळपोळ प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. या प्रकरणी पोलिसांनी सक्त कारवाई केली आहे. आरोपी नक्की मराठा समाजाचे होते, की आणखी दुसरे कोणी होते? असा सवाल मराठा याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे. निव्वळ प्रसिद्धीसाठी हायकोर्टात जाऊन याचिका दाखल करणं स्टंट आहे. हा प्रकार पोलीस तपासावर प्रभाव टाकणारा आहे. मराठा दहशतवादी असल्यासारखा गाजावाजा करण्यात येत आहे. रेकॉर्ड ब्रेक मोर्चे काढून आम्ही जगापुढं आदर्श ठेवलाय. शांततेत आंदोलनं केली. यापुढील आमची आंदोलनं याचं प्रकारे होणार आहेत. शांतता, संयमाची शिकवण आम्हाला छत्रपतींची आहे. हा सगळा प्रकार प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, अशी टीका मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सदावर्ते यांच्यावर केलीय.


हेही वाचा -

  1. Maratha Reservation Deadline: मराठा आरक्षणाच्या अंतिम तारखेबाबत घोळ, पहा कोण काय म्हणाले?
  2. Raju Shetti Protest March : मराठा आंदोलनामुळं स्थगित झालेल्या 'आक्रोश' पदयात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात
  3. Maharashtra Karnataka Border Dispute : संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा दिल्यानं महाराष्ट्र एकीकरण समितीच्या 18 पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.