औरंगाबाद - भालगावमधील दोन शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस आणि मोसंबीची लागवड केली होती. मात्र विद्युत तारांच्या स्पार्किंगमुळे शेताला आग लागली आणि हे पीक त्यामध्ये जळून खाक झाले. याविरोधात शेतकऱ्यांनी थेट जिल्हा ग्राहक मंचात धाव घेतली होती. दरम्यान ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली असून, शेतकऱ्यांना 83 लाख 7 हजार 610 रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश महावितरणला देण्यात आले आहेत.
जिल्ह्यातील भालगाव येथील शेतकरी दडाबाई बाबुराव डोईफोडे आणि रामेश्वर बाथुराव डोईफोडे यांची गट नंबर २७३ मध्ये दोन एकर शेतजमीन आहे. या शेतीत डोईफोडे हे नियमितपणे पिक घेतात. घटना घडली तेव्हा त्यांनी आपल्या शेतामध्ये ऊस आणि मोसंबिची लागवड केली होती. दरम्यान डोईफोडे यांच्या शेतातून विद्युत तारा गेल्या आहेत. यातील काही तारा या खाली लोंबकाळत होत्या, 27 मे 2019 रोजी परीसरात जोरदार वादळ झाले. यावेळी शेतात लोंबकळणाऱ्या तारांमध्ये घर्षण होऊन, त्याच्या थिनग्या पिकांवर पडल्यामुळे पिकाने पेट घेतला. या घटनेत पीक जळून खाक झाल्याने या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांनी महावितरणकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. मात्र महावितरणकडून शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले.
शेतकऱ्यांची जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार
संबंधित शेतकऱ्यांनी अॅड. संभाजी तवार यांच्यामार्फत महावितरण कंपनीविरोधात जिल्हा ग्राहक मंचाकडे दावा दाखल केला होता. ग्राहक मंचाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. युक्तीवाद आणि साक्षी पुराव्याच्या आधारे ग्राहक मंचाने महावितरणला शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 83 लाख 7 हजार 610 रुपये तीस दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले आहेत.