अमरावती - अमरावती-परतवाडा मार्गावरील अष्टमासिद्धी परिसरातील दोन एकर शेतामधील तब्बल अडीच हजार पपईचे झाडे काही अज्ञात व्यक्तीने कापून टाकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामुळे पोटच्या लेकराप्रमाणे जगलेली पपई झाडे उद्ध्वस्त झाल्याने अचलपूर येथील शेतकरी मनोहर पोकळे यांचे जवळपास सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
अचलपूरमधील बिलनपुरा येथे राहणाऱ्या मनोहर पोकळे यांच्याकडे एकूण अठरा एकर शेती आहे. त्यापैकी त्यांनी दोन एकर शेतीवर मागील वर्षी उन्हाळ्यात अडीच लाख रुपये खर्च करून पपईची लागवड केली होती. मोठ्या मेहनतीने तयार केलेल्या पपईमधून यंदा सात लाख रुपयांचे उत्पादन अपेक्षित होते. शनिवारी मध्यरात्री अचानक अज्ञात व्यक्तीने जवळपास अडीच हजार झाडे कापून टाकल्याचे दिसले. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, या प्रकरणी शेतकरी मनोहर पोकळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.