ETV Bharat / state

बांबूनं आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 2, 2024, 9:10 AM IST

bamboo farming profit : मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातमधील राहू या गावातील आदिवासी बांधवांना 2016 पासून बांबू कटाईचं काम मिळालं. आपल्या गावातच रोजगार मिळाल्यामुळं वर्षातून आठ महिने ओस पडणारं गाव आता हळू-हळू समृद्ध व्हायला लागलंय. अवघ्या सात ते आठ वर्षात 150 घर आणि 630 लोकसंख्या असणाऱ्या राहू गावाचं उत्पन्न एक कोटीच्या वर पोहोचलंय. बांबूनं समृद्ध केलेल्या या गावाच्या आज सर्व प्राथमिक गरजा पूर्ण झाल्या आहेत.

special story of adivasis of melghat rahu village became self reliant
बांबूने आणली समृद्धी; मेळघाटातील राहू गावच्या आदिवासींची रोजगारासाठी थांबली भटकंती

वर्षाला 1 कोटींचा नफा

अमरावती bamboo farming profit : राहू गावातील प्रत्येक व्यक्तीचा एकमेकांवर प्रचंड विश्वास असणं हे या गावातील सकारात्मक वैशिष्ट्य होय. गावाच्या हितासंदर्भात गावातील प्रत्येक व्यक्तीचे मत घेऊन ग्रामसभा निर्णय घेते. 2014 च्या वनहक्क कायद्यानुसार जंगलातील संसाधनावर आदिवासींनाही हक्क आहे, या जाणिवेतून ग्रामसभेनं जंगलातील बांबू कटाई संदर्भात वन विभागाकडं प्रस्ताव सादर केला. वनविभागानं हा प्रस्ताव मान्य केल्यावर बांबू कटाई संदर्भात ग्रामस्थांनी एक समिती तयार केली. या समितीच्या माध्यमातून गावाच्या प्रगतीचं पहिलं पाऊल पडलं, असं बांबू कटाई समितीचे सदस्य मुंगीलाल भुसुम यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना सांगितलं. तसंच पहिल्या वर्षाला 22 लाख रुपयांचा लाभ झाला होता. तर आज वर्षाला 1 कोटींचा नफा गावाला होत असल्याचंही ते म्हणाले.


अंदाजपत्रकानुसार होते बांबू कटाई : शासनानं 2016 मध्ये राहू गावालगत असणाऱ्या साडेचार हेक्‍टर जंगलाचं सर्वेक्षण करून या जंगल परिसराचे चार भाग केले आहेत. या चारपैकी कुठल्याही एका भागात प्रत्येक वर्षी किती बांबू कटाई करायची याचे अंदाजपत्रक वनविभागाच्या वतीनं राहू ग्रामपंचायतला सादर केले. या अंदाजपत्रकानुसार बांबू कटाई समिती जंगलात बांबू कटाई करते. राहू गावातील ग्रामस्थांसह लगतच्या गावातील लोकांनादेखील या कामातून रोजगार प्राप्त होतो. फेब्रुवारी, मार्च, आणि एप्रिल अशा तीन महिन्याच्या काळात चालणाऱ्या बांबू कटाई कामांमध्ये एक व्यक्ती सुमारे वार्षिक 75 ते 80 हजार रुपये कमवतो.


बांबुला मोठी मागणी : राहू गावच्या वेशीवर जंगलात बराच लांबपर्यंत बांबूच्या थप्प्या लागलेल्या दिसतात. या भागात मानवेल प्रजातीचा बांबू आहे. अतिशय मजबूत आणि टिकाऊ असणाऱ्या या बांबूची किंमत 45 ते 50 रुपये इतकी आहे. अमरावती, नागपूर यासह मध्य प्रदेशातील खंडवा, बैतूल या भागात या बांबूला मोठी मागणी आहे. दरवर्षी या बांबूंचा सर्रास वापर केला जातो. बांबूच्या एका गठ्ठ्यासाठी दोनशे रुपयांपासून खुली बोली सुरू होते, अशी माहिती मुंगीलाल भुसुम यांनी दिली.

बांबूच्या झाडाचं वय हे 70 ते 75 वर्ष इतके असते. विशेष म्हणजे बांबूला आयुष्यात एकदाच पिवळ्या रंगाचे दाट फुल येतात. हा फुलोरा आल्यावर बांबूचे आयुष्य संपतं. त्यानंतर या बांबूची कटाई केली जाते- वनस्पतींचे जाणकार, सेवानिवृत्त वनपाल सोमेश्वर करवाडे


कोरोना काळातही गावात समृद्धी : कोरोना काळात राहू या गावात इतर गावातून येणाऱ्या व्यक्तींना बंदी घालण्यात आली होती. ग्रामस्थांचा धीर वाढवण्यासाठी गावातील प्रत्येक महिलेच्या खात्यात ग्रामसभेनं दहा हजार रुपये जमा केले होते. याशिवाय बांबू कटाईचं कामदेखील सुरू असल्यामुळं प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कामाचा मोबदला देखील मिळत होता.

हेही वाचा -

  1. उघड्या अंगावर मोडतात बाभळीचे काटे, काट्यांच्या गंजीवर मारतात उड्या; मानकर जमातीत आगळीवेगळी प्रथा
  2. बाप रे बाप! अर्धाकोटी किंमतीचा रेडा 'सुल्तान'ने वेधलं अमरावतीकरांचं लक्ष
  3. बहिरम बुवाच्या यात्रेला सुरुवात, नव्या वर्षात उसळणार गर्दी; हंटी मटण ठरतेय आकर्षण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.