अमरावती - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन ४.० सुरू आहे. त्यामुळे परराज्यातील लाखो मजूर मिळेल त्या वाहनाने गाव गाठण्याचे चक्र सुरूच आहे. प्रवास करताना या मजुरांकडे पैसे नसल्याने हे परप्रांतीय मजूर उपाशी प्रवास करू नये म्हणून अमरावती येथील सामाजिक कार्यकर्ते संतोषसिंह गैरवार व बजरंग दलाच्या माध्यमातून दरोरोज एक क्विंटल खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. अमरावती जवळच्या नांदगावपेठ टोल नाक्यावर खिचडीचे वाटप केले जात आहे. मागील दीड महिन्यापासून त्यांचा हा उपक्रम सुरू आहे.
देशात लॉकडाऊन असल्याने लाखो परप्रांतीय मजूर हे मुंबईसारख्या महानगरात अडकून पडले होते. अनेक दिवस वाहतुकीला परवानगी नसल्याने अनेक मजूर पायदळीच गावाकडे निघाले. दरम्यान, अमरावतीकडून जाणारे काही मजूर उपाशी वाटचाल करत असल्याचे गैरवार यांच्या लक्षात आले. तेव्हापासून बजरंग दल व त्यांनी या गरजू लोकांसाठी जेवणाची व्यवस्था म्हणून खिचडीची व्यवस्था केली. आता या टोल नाक्यावर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो मजुरांना या खिचडीचे वाटप करण्यात येत आहे. या उपक्रामातून दरोरोज येथे एक क्विंटल तांदळाची खिचडी बनवून हजारो मजुरांना वितरित केल्या जाते. मात्र, तत्पूर्वी सर्व प्रवाशांना सॅनिटायझरने हात धुवायला सांगितले जाते आणि त्यानंतर, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत जेवण दिल्या जात आहे.