ETV Bharat / state

Deshmukh on Fadnavis : पाणी पुरवठा योजनेत उपमुख्यमंत्र्यांकडून गलिच्छ राजकारण; आमदार नितीन देशमुख करणार विधिमंडळ परिसरात उपोषण

author img

By

Published : Mar 12, 2023, 10:23 PM IST

नितीन आमदार देशमुख
नितीन आमदार देशमुख

अकाेला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा याेजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. यावर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टिका केली आहे.

नितीन आमदार देशमुख

अकोला : भाजपचा केवळ शिवसेनेच्या मतदार संघातील विकास कामांना विरोध असून, ६० टक्के काम झालेल्या ६९ गावे पाणी पुरवठा योजनेला स्थगिती देत पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गलिच्छ राजकारण केले, अशी टिका उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली. राजकरण करून जनतेला पाण्यापासून वंचित ठेवण्याच्या निषेधार्थ आपण मंगळवारी विधिमंडळाच्या परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार असून, अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो ग्रामस्थ आदोलन करतील, अशी माहिती देत त्यांनी राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.

पुरवठा योजनेला सरकारकडून स्थगिती : पुढे ते म्हणाले, बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्यातील गावांसाठी वरदान ठरणाऱ्या व उद्धव ठाकरे यांची शिवसेना आग्रही असलेल्या ६९ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला शिंदे-फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे. या योजनेला वान प्रकल्पातून पाणी पुरवठा होणार असून, पाणी देण्याला तेल्हारा तालुक्यातील काही ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

ग्रामस्थांना तहानलेले ठेवले : वानमधून शेगाव, जळगाव जामोद येथेही पाणी पुरवठा होतो. मात्र, त्या ठिकाणी भाजपचा आमदार असून, बाळापूर येथे शिवसेनेचा आमदार असल्यानेच भाजपचे आमदार विरोध करीत आहेत. पालकमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी पाणी टंचाई निवारण्यासाठी बैठक घेणे आवश्यक होते. मात्र, हे करता त्यांनी तत्कालीन ठाकरे सरकारने मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेलाच स्थगिती देत ग्रामस्थांना तहानलेले ठेवले आहे. स्वत:ला हींदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकराला ग्रामस्थ हे हींदू दिसत नाहीत काय, असा सवाल त्यांनी केला. पत्रकार परिषेदला माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, पूर्वचे अध्यक्ष राहुल कराळे, पश्चिमचे प्रमुख राजेश मिश्रा, विकास पागृत, उमेश जाधव आदी होते.

न्यायप्रविष्ट असतानाही स्थगिती : ६० गावे पाणी पुरवठा योजनचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही सरकारने स्थगिती दिली आहे. योजनेची किंमत २१९ कोटी रुपये असून, प्रत्यक्ष योजनेवर १९२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. त्यापैकि १०८ कोटी रुपये खर्च झाले असून, कंत्राटदाराला ९२ कोटीचे देयकही अदा करण्यात आले आहे. असे असनाताही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योजनेला स्थगिती देत स्वत:ची बौद्धिक दिवाळखोरीच जाहीर केली, अशी टीका आमदार देशमुख यांनी केली.

भाजपचे आमदार काय करतात? वानधरणातून महापालिकेच्या पाणी पुरवठा योजनेसाठीही पाणी आरक्षित केले होते. त्यामुळे आगामी काळात शिवसेना यावरही आंदोलन करेल, असा इशारा आमदार देशमुख यांनी दिला.

...तर सरकारने दखल घ्यावी : प्रत्यक्ष वान प्रकल्पासाठी तेल्हारा तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन अधिगृहित झालेली नाही, असे आमदार देशमुख म्हणाले. मात्र शेतकऱ्यांच्या नावाखाली चार-पाच भाजप कार्यकर्त्यांनी पाणी आरक्षणाला विरोध केला आणि अकोटचे भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांनी पत्र दिल्याने योजनेला स्थगिती देण्यात आली. आता मंगळवारी शेकडे ग्रामस्थांकडून होणाऱ्या आंदोलनाची पाण्यावरूनही राजकारण करणारे शिंदे-फडणवीस सरकार घेईल काय, असा सवाल आमदार देशमुख यांनी केला.

हेही वाचा - Pollution in Mumbai: मुंबईत प्रदूषण करणाऱ्यांवर १ एप्रिलपासून कारवाई, जी २० साठी पुन्हा सुशोभीकरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.