ETV Bharat / state

Vikhe Patil Reaction On Thorat: बाळासाहेब थोरातांच्या 'त्या' बॅनरवर विखे पाटलांची प्रतिक्रिया, म्हणाले...

author img

By

Published : Jun 24, 2023, 8:05 PM IST

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर गावात भावी मुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर्स कार्यकर्त्यांनी लावले आहेत. त्यांच्या उपस्थितीत बेलापूर येथे आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. थोरात येणार असल्याने यांच्या स्वागतासाठी ही बॅनरबाजी कार्यकर्त्यांनी केली आहे. यावर मंत्री विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Vikhe Patil Reaction On Thorat
बाळासाहेब थोरात बॅनर

विखे पाटलांची प्रतिक्रिया

अहमदनगर : बाळासाहेब थोरातांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राधाकृष्ण विखे यांनी बॅनर संदर्भात भाष्य केले. प्रत्येक पक्षाला कोणाला मुख्यमंत्री करायचा याचा अधिकार आहे; मात्र त्यासाठी संख्याबळ लागते. केवळ चाळीस-पन्नास आमदार निवडून आणून तो व्यक्ती मुख्यमंत्री होत नाही, असा टोला विखे पाटील यांनी लगावला आहे. काही लोकांना स्वप्न बघायची सवय आहे. त्यामुळे स्वप्नरंजन करायला हरकत नाही, असेही यावेळी विखे पाटील म्हणाले.


गणेश कारखान्याविषयी भूमिका : गणेश कारखाना भाडेतत्त्वावर घेतलेल्या कराराची मुदत संपली असली तरी, ती वाढवण्याचा विखे पाटील कारखान्याला अधिकार होता; मात्र गणेशच्या सभासदांचा कौल मान्य करून, नवनिर्वाचित संचालक मंडळाने कारखाना चालवावा. आमच्या कराराची कोणतीही अडचण त्यांना येणार नाही. गणेश कारखान्याकरिता सहकार्याचीच भूमिका राहील, असे स्पष्ट मत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. गणेश कारखाना निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच शिर्डी येथे पत्रकारांशी बोलताना मंत्री विखे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली.


कंत्राटी कर्मचारी भरती नाही: शिर्डी साईबाबा संस्थानमध्ये ठेकेदारी पध्दतीने कर्मचारी भरण्याची पध्दत सुरू झाल्याच्या चर्चेने कामगारांमध्ये अस्वस्थता आहे. याबाबत आज संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवा शंकर यांच्या समवेत चर्चा झाली. यामध्ये असा कोणताही प्रस्ताव नाही किंवा त्या पध्दतीचा अवलंब होणार नसल्याची ग्वाही संस्थानच्या वतीने देण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. उत्सवाच्या निमित्ताने साईसेवक नेमले जातात. त्यांचे कामही मर्यादित कालावधीसाठी असते. याचा परिणाम सध्याच्या कर्मचाऱ्यांवर होणार नाही, असे विखे पाटील म्हणाले.


या कार्यासाठी जागा उपलब्ध केली जाईल: प्रधानमंत्री आवास योजना, खासगी बस पार्कींगकरिता जागा उपलब्ध करून दिली जाईल. या बरोबरीनेच साईबाबांच्या संदर्भात थीमपार्क, क्रीडासंकुल आणि शिर्डी सुशोभिकरणातून धार्मिक वातावरण शहरात निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या भागात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठीच्या आराखड्याला लवकरच मूर्त स्वरूप येईल, असा विश्वास अहमदनगरचे पालकमंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.