ETV Bharat / state

Devendra Fadnavis : आमचे फेसबुक सरकार नसून...; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला

author img

By

Published : Aug 17, 2023, 8:43 PM IST

Fadnavis In Ahmednagar
फडणवीस

आमचे फेसबुक सरकार नसून थेट जनतेत जाऊन काम करणारे सरकार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. गुरुवारी शिर्डी येथे आयोजित १२व्या जिल्हास्तरीय 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला झोकून देत लोकांसाठी अहोरात्र काम करत आहेत, अशी ग्वाहीसुद्धा देवेंद्र फडणवीसांनी दिली.

राज्य शासनाच्या कामाविषयी फडणवीसांचे मत

अहमदनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य सरकार हे ३६५ दिवस लोकांच्या दारात जाऊन काम करीत राहील. आपले सरकार बंद दाराआड राहणार. आमचे फेसबुक सरकार नसून थेट जनतेत जाऊन काम करणारे सरकार आहे. लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही तर मागेल त्याला शेततळे, ट्रॅक्टर, आस्तरिकरण, ड्रिप इरिगेशन आदी योजनांचा दिला जाईल. ज्यांनी आमच्याशी बेइमानी केली त्यांचा पक्षच आम्ही इकडे घेऊन आलो आहे, असा टोला त्यांनी उध्दव ठाकरेंना लगावला. आज शिर्डी येथे आयोजित १२व्या जिल्हास्तरीय 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात ते बोलत होते.

तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत:ला झोकून देत लोकांसाठी अहोरात्र काम करीत आहेत. त्यांच्याकडे कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला. पारदर्शी, प्रामाणिकपणा आणि पूर्ण क्षमतेने जनहिताचे काम सुरू आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीही १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदीच भाषण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

ते मोदींनी नऊ वर्षात केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसेवकाच्या भूमिकेतून देशाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम करीत आहेत. जे या आधीच्या सरकारला गेल्या ५०-६० वर्षांत जमले नाही, ते मोदींनी ९ वर्षांत करून दाखविले. शासकीय योजना केवळ कागदावरच न ठेवता त्यांना पाठबळ दिले. त्यामुळे देश प्रगतीपथावर असून जगात देशाचा सन्मान वाढला आहे. देशाची अर्थव्यवस्था अधिक बळकट करून जगात अव्वल स्थानी येण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी येत्या २०२४ च्या निवडणुकीत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. आज शिर्डी येथे आयोजित १२व्या जिल्हास्तरीय 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमात ते बोलत होते.

ट्रिपल इंजिन सरकारचे राज्यभर काम: मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारवर अविश्वास आणून हात दाखवून अवलक्षण केले. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून शासकीय योजना थेट लोकांच्या दारात पोहोचती करण्यासाठी राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार राज्यभर 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम आयोजित करीत आहेत. जिल्ह्यात शासनाचे विविध लाभार्थी म्हणून २४ लाख ४८ हजार एवढी नोंद झाली असून त्यांना ३ हजार ९८२ कोटींचे वाटप होत आहे. शासकीय योजना यशस्वी कशा कराव्यात, हे महाराष्ट्राने देशाला दाखवून दिले आहे. अहमदनगर जिल्हा हा सहकाराचा, साखर उत्पादनाचा जिल्हा आहे. देशाचे सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयातून राज्यातील सहकारी चळवळीला नवसंजीवनी दिली आहे. संकट काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्राला पुन्हा देशात पहिल्या नंबरवर आणण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.


शेतकऱ्यांना संकट काळात मदतीचा हात: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशाचा भरीव विकास होत आहे. हजारो कोटींची विकास कामे देशभर सुरू आहेत. काळानुसार बदल करण्याची गरज विचारात घेऊन विकास आणि अर्थकारणाला गती मिळून स्थानिकांना रोजगार मिळत आहे. पूर्वी जिथे ३० लाख कोटी खर्च व्हायचे तिथे आता विकासासाठी १०० लाख कोटी खर्च होत आहेत. १ रुपयात पीक विमा देऊन शेतकऱ्यांना संकट काळात मदतीचा हात पुढे केला आहे. सहकार व गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आयकराच्या जाचातून मुक्त करून नवीन ऊर्जा दिली आहे. नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे. त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जीवाचे रान करू, अशी ग्वाही देत पवार यांनी लोकसंख्या वाढीबाबत चिंता व्यक्त केली.

मंत्र्यांनी घेतले साईबाबाचे दर्शन: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री तथा अहमदनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील, शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शिर्डी लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिर्डीत येऊन साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. यावेळी साईबाबांची पद्यपूजा तसेच 'शिर्डी माझे पंढरपूर' ही छोटी आरतीही केली.

हेही वाचा:

  1. Devendra Fadnavis Loksabha : फडणवीस नागपुरातून लोकसभा लढवणार? बावनकुळे म्हणाले...
  2. Shasan Aaplya Dari : 'शासन आपल्या दारी' आणि विद्यार्थी वाऱ्यावरी! कार्यक्रमासाठी बसगाड्या सोडल्याने परीक्षा बुडल्या
  3. BRS News Beed : शिवराज बांगर यांचा राजीनामा; बीआरएस ही भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.